लातूर - दसरा सणामध्ये झेंडू, शेवंती, ऑस्टर फुलांचे मोठे महत्त्व आहे. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे फुलांच्या दरामध्येही लहरीपणा पहावयास मिळाला. शुक्रवारी 100 रुपये किलो दराची फुले आज सकाळी 200 रुपयांवर पोहचली आहेत. वाढती मागणी, कमी आवक यामुळे दर वाढत असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. मात्र, सणाचे महत्त्व असल्याने वाढीव दराने का होईना ग्राहक खरेदी करत आहेत.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा शेती व्यवसायाला बसला आहे. खरिपातील पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले असून फुलांच्या लागवडीवरही परिणाम झाला आहे. झेंडूच्या फुलांची लागवडही यंदा घटली होती. शहरातील गंजगोलाई, हनुमान चौक, दयानंद महाविद्यालय गेट याठिकाणी फुलांची विक्री केली जाते. यंदा आवक घटल्याने या बाजारांमध्ये फुलांच्या दरामध्ये दुपटीने वाढ झालेली दिसली. सौदाबाजारात 125 रुपये किलो तर किरकोळ ठिकाणी फुलांची विक्री 200 रुपये किलोने होत आहे. रविवारी सकाळी सर्व बाजारपेठ ही फुलांनी बहरली होती मात्र, दर गगनाला भिडल्याने ग्राहकांची वर्दळ कमी होती.
पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाल्याची आवकही कमी झाली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे तो झेंडूच्या फुलांचा. दसरा सणाच्या दिवशी पूजेसाठी या फुलांचे महत्व असते. हे मुहूर्त टळल्यानंतर फुलांचे दर काय राहतील हे सांगता येत नाही. त्यामुळे आता मिळत असणाऱया दरामुळे विक्रेत्यांमध्ये समाधान आहे.