लातूर - एकवेळ शिपाई नवरा चालेल, एखाद्या दुकानात काम करणारा नोकर चालेल. पण, शेतकरी नवरा नको असे लग्नाळू मुली आता बिनदिक्कत म्हणू लागल्या आहेत. शेती व्यवसायाचा घसरलेला दर्जा, त्यामुळे शेतकऱ्यांचीखालावलेली आर्थिक परिस्थिती शेतकरी मुलांच्या लग्नात मोठा अडथळा ठरत आहे. याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने केला आहे.
पूर्वी शेती हा सर्वोत्त व्यवसाय समजला जायचा. नोकरी करणे प्रतिष्ठेचे समजले जात नव्हते. पण, काळ बदलला तसे प्रतिष्ठेचे मापदंडही बदलले. आता शेती करणे हे कमी प्रतीचे समजले जात आहे. शेतीसंबंधी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका शेतकऱयांना आर्थिक आघाडीवर बसत आहे. पण, तो सांस्कृतिक आणि सामाजिक स्तरावरही बसत आहे. याचा सगळ्यात मोठा परिणाम लग्न संस्थेत जाणवत आहे. लग्नेच्छुक शेतकरी मुलांना मुली सरळ नाकारत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
लातूर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आढळून आली. लातूर तालुक्यातील भिसे वाघोली या गावात ईटीव्ही भारतने संवाद साधला. तेव्हा लग्नेच्छुक शेतकरी तरुणांनी आपल्या व्यथा मांडल्या. लग्नासाठी अनेक मुलींच्या घरचे उंबरठे ही मुले झिजवत आहेत. पण, एकही मुलगी वा तिचे पालक ताकास तूर लागू देत नाहीत. या नकाराचे कारण फक्त शेतकरी असणे हेच आहे.
आपला नवरा हा शिपाई असला तरी चालेल, पण शेतकरी नको अशी भूमिका मुली आणि त्यांचे पालक घेत आहेत. शेती विकून एखादा व्यवसाय सुरु करण्याचे सल्लेही शेतकरी तरुणांना देण्यात येत आहेत. भिसे वाघोली गावात लग्नाचे वय झालेले अनेक तरुण दिसून आले. आज प्रत्येक गावात लग्नेच्छुक ४० ते ५० तरुण लग्नाविना अडकून बसले आहेत. वयाचे ३० - ३५ वर्षे ओलांडली तरी लग्न जमत नाही. त्यामुळे हे तरुण निराशेच्या गर्तेत लोटले जात आहेत.
तरुण पोरांनी बदलत्या काळानुसार बदलले पाहिजे. शेतीवर अवलंबून न राहता छोटा मोठा व्यवसाय करावा असा सल्ला आता गावातील वडीलधारी मंडळी देत आहेत.