लातूर - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये मंगळवारी सर्वाधिक रुग्णांची भर पडली. दिवसभरात 271 कोरोना रुग्ण वाढले असून एकाच दिवशी 12 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाने संपूर्ण जिल्ह्याला विळख्यात घेतले आहे. दिवसाकाठी 200 रुग्णांची वाढ होत आहे. मंगळवारी सर्वाधिक 271 रुग्ण वाढले आहेत. लातूर शहरात लॉकडाऊन असतानाही रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. तर दुसरीकडे 16 ऑगस्टपासून लॉकडाऊन उठवण्यात येणार आहे. तत्पूर्वी 1 लाख जणांची अँटीजन टेस्ट करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे रॅपिड टेस्ट वाढवण्यात आल्या आहेत. मंगळवारी 271 पॉझिटिव्ह अहवालपैकी 18 अहवाल हे आर.पी.डी.एस.च्या माध्यमातून तर उर्वरित 253 पॉझिटिव्ह अहवाल हे रॅपिड टेस्टमधून समोर आले आहेत. तसेच रॅपिड टेस्ट वाढवण्यात येणार असल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देखील वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

एकूण बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 101 वर पोहोचली आहे. यापैकी 2 हजार 233 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 1 हजार 712 जणांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 156 जणांना जीव गमवावा लागला आहे. रॅपिड टेस्टमुळे प्राथमिक अवस्थेतच रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मृत्यूदर देखील कमी होत असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.