कोल्हापूर- महाराष्ट्राचे शक्तीस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील वातावरण भगवेमय झाले आहे. त्यासाठी तरुणांनी कंबर कसली असून शहरात जोरदार तयारी सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दाच्या शिवजयंतीवर राज्य शासनाने काही निर्बंध घातले आहेत. मात्र, शासनमान्य कार्यक्रम हजारोंच्या उपस्थित सुरू आहेत, मग शिवजयंतीवर बंधन का? असा प्रश्न शिवभक्त उपस्थित करत आहेत. त्यामुळे शिवजयंतीच्या दिवशी शिवभक्त शासनाचे नियम पाळणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.
राजदरबाचा भव्य सेट
शिवजयंतीनिमित कोल्हापूरच्या उभा मारुती चौकातील शिवाजी तालीम यांच्याकडून जोरदार करण्यात आली आहे. संपूर्ण शिवाजी पेठ जोरदार तयारीला लागली आहे. यंदा भव्य असा राजवाडा सेट उभारण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी सायंकाळी भव्य मिरवणूक काढली जाते. त्यावेळी जिल्ह्यातील मंत्री उपस्थित असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे ही मिरवणूक रद्द होण्याची शक्यता आहे.
आग्र्याची सुटका महानाट्याचा प्रयोग
मिरजकर तिकटी येथे मावळ ग्रुपच्यावतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ फेब्रुवारीपासून मेडिकल कॅम्प आयोजित केला असून, त्यामध्ये नेत्र व दंत तपासणी केली जाणार आहे. तसेच 'मावळा' या आपात्कालीन फोर्स संस्थेचे उदघाटनही करण्यात येणार आहे. तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या इतिहासातील ऐतिहासिक 'आग्र्याची सुटका' या महानाट्याचे सादरीकरण होणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी कोरोनायोद्धांचा सत्कार होणार असून १९ फेब्रुवारीला शिवजयंतीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे.
जगात भारी १९ फेब्रुवारी
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे शक्तीस्थान आहे. त्यामुळे त्यांची जयंती गल्लोगल्ली साजरी होत असते. 'जगात भारी १९ फेब्रुवारी' अशी टॅगलाईन देत करवीरवासीयांनी जोरदार तयारी केली आहे. शहरातील जवळपास ८० तरुण मंडळांनी विधायक उपक्रम साजरा करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच चौकाचौकात भगवे ध्वज, पुतळे याची स्टॉल पाहायला मिळत आहे.