कोल्हापूर- निती आयोगाच्या विद्वानांनी केंद्र सरकारला ज्या शिफारसी केल्या आहेत, त्या शिफारसी म्हणजे उंटावरच्या शहाण्याने केलेल्या शिफारसी आहेत. अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.
अतिरिक्त साखरेचा व अतिरिक्त ऊस शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी देशातील उसाखालील ३ लाख हेक्टर शेती अन्य पिकाकडे वळवावी, अशी शिफारस नीती आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. तसेच यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून हेक्टरी ६ हजार रुपयांचे अनुदान ३ वर्षासाठी द्यावे, असे सुचवण्यात आले आहे. या शिफारसीवर राजू शेट्टी यांनी आक्षेप घेत टीका केली आहे.
शेट्टी म्हणाले, शेतकरी उसाकडे का वळतो? याचा शोध सरकारने घेतला पाहिजे. उसातून शाश्वत हमीभाव मिळतो, म्हणून शेतकरी उसाकडे वळतो. मात्र, उसाशिवाय इतर पिकांमध्ये शाश्वत हमीभाव कसा मिळतो याकडे सरकारने बघितले पाहिजे, असे देखील राजू शेट्टी म्हणाले. एका बाजूला साखरीचे जास्त उत्पादन होते, तर दुसर्या बाजूला बाहेरच्या देशातून आपण खाद्यतेल, डाळ आयात करतो. मात्र, आपण डाळवर्गीय पिकांचे हमीभाव का वाढवत नाही? त्याच्या खरेदीचा हमी का घेत नाही? तेल बियांना अनुदान का देत नाही? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.
असे केले तर महाग होत असलेल्या डॉलरची किंमत नियंत्रणात आणता येईल. परंतु, हे न करता 85 टक्के ऊस खरेदी करा, ऊस पीक कमी घ्या, ही शिफारस म्हणजे व्यवहारिक सूचना नीती आयोगाने केली आहे. जमिनीशी संबंध नसलेल्या निती आयोगात गेल्यावर ते काय माकड चेष्टा करू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला.
हेही वाचा- आमदार आवाडेंच्या पाठपुराव्याला यश; शल्यचिकित्सकांचे मुख्यालय आता आयजीएममध्ये