जालना - जिल्ह्यातील वडीगोद्रीपासून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चालत्या स्कॉर्पिओने घेतला पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन महिन्यांच्या बाळासह पाच जण सुखरूप आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यावरून प्रवास करत असलेल्या स्कॉपिओच्या बोनेटमधून अचानक धूर यायला सुरुवात झाली. चालकाच्या लक्षात ही बाब आल्यामुळे चालकाने रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून बॉनेट उघडून पाहिले. त्यानंतर क्षणार्धात गाडीने पेट घेतला. आगीचे लोट बघताच गाडीतील सर्व प्रवाशी बाहेर पडले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी गाडीतील कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे.
गाडीतील साहित्य व कागदपत्रे जळून खाक -
बीड येथील रहिवासी खलील इनामदार हे आपल्या कुटूंबातील पाच सदस्यांसह केजवरून औरंगाबादकडे स्कॉपिओ गाडीने जात होते. तेव्हा या स्कॉपिओ गाडीमधून अचानक समोरून इंजिनमधून धूर निघत
असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी गाडी थांबवून गाडीचे इंजिन तपासण्यासाठी बोनेट उघडले असता, इंजिनने अचानक पेट घेतला. तेव्हा त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीने जास्त पेट घेतल्यामुळे गाडी विझवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. यावेळी गाडीतील साहित्य व कागदपत्रे जळून खाक झाली. तसेच जमलेल्या नागरिकांनी जीप विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत गाडी सुरक्षित ठिकाणी हलविली.
हेही वाचा - जम्मू काश्मीर : पूंछमध्ये मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रास्त्रे जप्त