जालना - देशासह राज्यात बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. यामुळे पोट्री फार्म व्यवसायिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशात डबघाईला आलेल्या पोल्ट्री व्यवसायाला उभारी देण्यासाठी जालन्यात चिकन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यात 60 व्यावसायिक
जालना जिल्ह्यात सुमारे 60 कुकूटपालन व्यवसाय करणारे शेतकरी आणि व्यावसायिक आहेत. मात्र सध्या बर्ड फ्लूच्या भीतीमुळे हे व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. केवळ गैरसमज असल्यामुळे लोकांनी चिकन खाणे सोडून दिले आहे, असे मत या व्यवसायिकांचे आहे. त्यामुळे हा गैरसमज दूर करण्यासाठी चिकन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या अधिकाऱ्यांची होती उपस्थिती
जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर, डॉमिनोजचे वरिष्ठ व्यवस्थापक हर्षल कौशिक यांच्यासह पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायिकांनी यावेळी हजेरी लावली.
मेळाव्याच्या उद्घाटनानंतर चिकन प्रेमींसाठी येथे विविध प्रकारच्या पदार्थांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी चिकन हे पूर्णपणे सुरक्षित असून ते खाल्ल्याने शरीराला आवश्यक असलेले पोस्टीक घटक मिळत असल्याचे सांगितले.
असा चालतो व्यवसाय
अंड्यामधून बाहेर पडलेली एक दिवसाची कोंबडी (पक्षी) विकत घेतात आणि आणि आपल्या शेतामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये या कोंबड्यांना खाद्य पाणी देऊन वाढवतात. सुमारे 40 ते 45 दिवसात या कोंबड्या वाढल्यानंतर त्यांना बाजारात विकले जाते. एका कोंबडीचे वजन दोन ते अडीच किलो भरते.
शासनाच्या परवानगीची गरज नाही
कुकूट पालन हा व्यवसाय शेतीशी जोडधंदा म्हणून केला जात असल्याने याला कोणत्याही प्रकारची शासनाची परवानगी घेण्याची गरज नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्याला हा व्यवसाय करायचा तो कमी भांडवलामध्ये या व्यवसायाला सुरुवात करू शकतो.