जळगाव - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यावर्षी रामनवमीचा उत्सव जाहीरपणे साजरा करता आला नाही. मात्र, जळगावातील नागरिकांनी रामनवमीच्या सायंकाळी आपल्या घरांसमोर दिवे प्रज्ज्वलित करून श्रीराम जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले.
जळगाव शहरातील विविध कॉलन्या तसेच उपनगरांमध्ये घरोघरी दीप प्रज्वलीत करून रामनवमी साजरी करण्यात आली. विश्वाचं कल्याण व्हावं, जगावर आलेले कोरोना विषाणूचे संकट दूर व्हावं, अशी प्रार्थना देखील यावेळी सर्वांनी केली. एकाच वेळी असंख्य दिवे प्रज्ज्वलित झाल्याने जळगाव शहरातील विविध कॉलन्या तसेच उपनगरे प्रकाशात न्हाऊन निघाली होती.
दिव्यांच्या प्रकाशामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा आपल्याला कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी निश्चितच कामी येईल, अशा प्रतिक्रिया देखील महिलांनी यावेळी व्यक्त केल्या.