जळगाव - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार राजीव देशमुख यांच्या प्रचारासाठी चाळीसगाव येथे शरद पवार यांची जाहीर सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी राज्यात कुस्ती हा महत्वाचा खेळ असून राज्यातील कुस्तीच्या संघटनेचा मी अध्यक्ष असल्याचे सांगत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
हेही वाचा... मोदींनी ५ वर्षांत जे देशाचे नुकसान केले, ते काँग्रेसने कधीच केले नाही - राहुल गांधी
.... आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही
आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर कोणीच विरोधक नाही, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला शरद पवारांनी उत्तर दिले. 'मुख्यमंत्री सांगतात आमचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. पण त्यांना हे माहीत नाही की आपल्या राज्यात कुस्ती हा महत्त्वाचा खेळ आहे. आणि कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही', असे बोलत पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

हेही वाचा... 'हिंमत असेल तर जाहीरनाम्यात कलम 370 परत लागू करण्याचा उल्लेख करा'
मोदी आणि फडणवीस सरकारवर पवारांची जोरदार टीका
चाळीसगाव येथील सभेत बोलताना शरद पवारांनी सरकारवर टीका केली आहे. 'राज्यात अनेक प्रश्न आहेत. मात्र पंतप्रधान येथे येऊन ३७० कलमबद्दल आपल्याला उत्तर देण्याची मागणी करतात. पण लोकांच्या पुढे ३७० हा प्रश्न नाहीये तर शेतीच्या समस्या महत्त्वाची आहे, असे पवार यावेळी म्हणाले. तसेच राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली, कर्जबाजारीपणा का वाढलाय हे प्रश्न सोडवण्याचे सोडून हे सरकार कलम ३७० पुढे करत आहे, असे बोलत पवारांनी भाजपच्या प्रचारातील कलम 370च्या वापराबाबत आक्षेप घेतला. तसेच राज्यात विरोधकांचे तोंड दाबण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. यासाठी सीबीआय, ईडी अशा अनेक घटकांचा वापर यात केला जातोय, असा आरोपही पवार यांनी केला आहे.