हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव परिसरात असलेल्या मदरसामध्ये बिहारमधून दरवर्षीच मुले शिकण्यासाठी येतात. मात्र यावर्षी पहिल्यांदाच मदरसामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असलेल्या मुलांना पटनामधील राजेंद्रनगर रेल्वे स्थानकावर एका महिला वकिलाच्या आरोपावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. याबद्दल आमचा काही आक्षेप नाही, मात्र मुलाच्या खिशातील 28 हजार रुपये काढून घेत त्यांना रात्रभर उपाशी पोटी ठेवले याचे फार दुःख असल्याचे मदरसा सचिव तथा मुख्यध्यापक ए.एफ. इनामदार यांनी म्हटले.
गोळेगाव येथे 2009 पासून जमिया अनवारू कुराण या मदरसाची स्थापना झालेली आहे. या मदरसामध्ये सध्या 118 विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून हे सर्व विद्यार्थी बिहार या राज्यातील असल्याची माहिती सचिव इमानदार यांनी दिली. या मदरशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असते. त्यामुळे आम्ही आमच्या मदरसाच्यावतीने त्या विद्यार्थ्यांचा शिक्षण खर्च करतो. विशेष म्हणजे मदरसामध्ये विद्यार्थ्यांना केवळ कुराण न शिकवता हिंदी, मराठी आणि इंग्रजीचे ज्ञानही दिले जाते. त्यामुळेच येथे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.
रविवारी या ठिकाणी बिहारवरून 13 विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत होते. मात्र, त्यांना एका महिला वकिलाच्या तक्रारीवरून अचानक पटना येथे ताब्यात घेण्यात आले. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना मुलांचे कागदपत्र तसेच त्यांच्या मदरसाच्या लेटरहेडवरील आधारनंबर सह माहिती कळविण्यात आली, मात्र त्याला देखील पोलिसांनी काहीच महत्त्व दिले नाही. मुलांची सर्व कागदपत्रे असतानादेखील त्यांना ताब्यात घेण्यात आले, ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही निश्चितच त्या तक्रार करणाऱ्या महिले विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करणार आहोत, असे मुख्यध्यापक इमानदार यांनी सांगितले.