हिंगोली - मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही सुशिक्षित तरुण शेतीला जोडव्यवसाय म्हणून मशरूमच्या शेतीकडे वळलेले आहेत. त्यानुसार मशरूम आता जिल्ह्यात चांगलेच प्रसिद्ध होत आहे. हे मशरूम आरोग्यासाठी गुणकारी असले तरीही पाहिजे तेवढी याची जनजागृती झालेली नाही. मात्र, ही शेती करणे म्हणजे समुद्रातून मोती काढल्यासारखेच असल्याचे कोळसा येथील लिमरा मशरूम उत्पादकांनी सांगितले. अनंत अडचणीचा सामना करत हे पीक घ्यावे लागते. नेमकं हे पीक घेताना कोणकोणत्या अडचणीला सामोरे जावे लागते, त्याचा 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून घेतलेला हा आढावा...
हेही वाचा - #CAA Protest : वंचित बहुजन आघाडी करणार राज्यभर आंदोलनं, ४ जानेवारीपासून सुरूवात
हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावात मशरूमची शेती केली जाते. सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील एमबीएचे शिक्षण पूर्ण करून नोकरीनिमित्त परराज्यात असलेल्या अकीब शेख यांनी आपले काका शेख मोबिन यांच्या मदतीने मशरूम शेती करण्यास सुरुवात केली. काकांचे शिक्षण हे केवळ दुसरीपर्यंत असले तरी अवजड कामे करण्यापेक्षा ही शेती करणे पुतण्याच्या मार्गदर्शनामुळे त्यांना अतिशय सोपे जात आहे. मात्र, मशरूमची शेती करत मशरूम ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हे तर जिकरीचे आहेच. मात्र, त्याची निर्मिती करणे म्हणजे तारेवरची कसरत असून, समुद्रातून मोती शोधण्यासारखेच आहे. एका वर्षांत अनेक वाईट अनुभव आले. मात्र, तलाठी असलेल्या भावाने अन् त्याच्या मुलाने शेख मोबिन यांना वारंवार दिलेला दिलासा हा खूप काही सांगून जातो. ही शेती करत असताना आर्थिक बजेट हळूहळू वाढत जाते. परंतु, शेती सुरू करण्यासाठी जे अगोदर मार्गदर्शन केलं जातं ते नंतर होत नाही. बीज या शेतीसाठी अतिमहत्त्वाचे असतात. ते बीज बाहेर गावावरून मागवले जाते. ते वेळेवर येत नाही तर, कधी चुकीच्या पत्त्यावर जाते. यामध्ये बीज खराब होण्याचा देखील धोका असतो. भव्य असे शेड करून त्या बीजची प्रतिक्षा करावी लागते. बीज दाखल होताच त्याच्या प्रतीक्षेत असलेलं सोयाबीनचे कुटार त्याचे निर्जंतुकीकरण करून, त्यामध्ये ते टाकले जाते.
हेही वाचा - ''अभ्यासपूर्ण पध्दतीने नाटकाकडे पाहण्याचा प्रयत्न 100 व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने व्हावा ही इच्छा''
या पिकाला वातावरण थंड असणे नितांत गरजेचे असते. एकीकडे 42 ते 43 अंशावर गेलेलं तापमान येथे केवळ कमीत कमी 22 अन् जास्तीत जास्त 25 अंश एवढे ठेवावे लागत असल्याचे शेख मोबिन यांनी सांगितले. एवढी मेहनत करून मशरूमचे उत्पादन काढल्यानंतर ते विक्रीला नेण्यासाठी मोठी करसत करावी लागत असल्याचे मोबिन सांगतात. हिंगोलीतील मशरूमला मुंबई, पुणे, नगर आदी ठिकाणी मागणी आहे.
मात्र, स्थानिक ठिकाणी या मशरूमचे गुणकारी महत्त्व अजूनही उमगलेच नसल्याने, पाहिजे तेवढ्या प्रमाणात याची मागणी येत नाही. ओली मशरूम 300 तर, वाळलेली मशरूम एक हजार रुपये प्रति किलोप्रमाणे मागणी होते. अशा अनेक संकटांवर मात करत शेख कुटुंब मशरूमची शेती करत करत टाकाऊ बेडपासून गांडूळ खत निर्मितीही करतात.
वास्तविक पाहता, मशरूम हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. यापासून कुपोषण दूर होऊ शकते, त्यामुळे प्रशासन स्थरावर मशरूम कुपोषमुक्तीसाठी वापरण्याची परवानगी दिली तर निश्चितच हिंगोली जिल्ह्यातील मशरूम उत्पादकांना चांगले दिवस येतील आणि जिल्हाही कुपोषणमुक्त होऊन चिमुकल्यांचे आरोग्य ठणठणीत राहण्यास मदत होईल. तसेच जिल्ह्यातील मजुरांना रोजगार प्राप्त होऊन मशरूममुळे हिंगोली जिल्ह्याचे मागासलेपण पुसून जाईल हे मात्र नक्की.
या आजारावर उपयुक्त आहे मशरूम -
वाळलेल्या मशरूमपासून बनवलेली पावडर सर्दी व शरीरातील विविध आजार नाहीसे करते
मुतखडा, लिव्हर, किडनीसह प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांसाठी मशरूम संजीवनीच आहे