हिंगोली- 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील 495 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, प्रत्येक गावातील भावी सरपंच व सदस्य पदासाठीचे उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरावयाचे आहे. त्यामुळे, इच्छुक कार्यकर्त्यांची ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी इंटरनेट कॅफे व महा ई सेवा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज तयार करताना पॅनल प्रमुखांच्या नाकी नऊ येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशातच ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या आधी जाहीर झालेले सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाल्याचा खुलासा केल्याने भावी सरपंचांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. त्यामुळे, या आधी सर्व पॅनल निवडून आणायच्या गप्पा करणारे स्वतःची एक सीट कशी निवडून आणायची याच्या तयारीला लागले आहेत. यामुळे कागदपत्रे करण्यासाठी पॅनल प्रमुख जोडे झिझवत आहेत. तर, काही पॅनल प्रमुख खुल्या व राखीव प्रवर्गातील सर्वच जागा निवडून कशा आणायच्या याच्या तयारीला लागले आहेत.
हेही वाचा - उपचारासाठी सरकारी योजनांच्या मदतीची अपेक्षा, हिंगोलीतील रुग्णावर बिकट परिस्थिती
हिंगोली शहरातील शासन मान्य, आपले सरकार सेवा केंद्र असलेल्या श्री. मल्टिसर्व्हिसेस येथे उमेदवारांना आवश्यक असलेल्या सर्वच कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी विविध 4 टेबल लावण्यात आले असून, येथे 24 तास ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उमेदवार हे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यासाठी आवश्यक ती कागदपत्रे गोळा करताना सर्वांच्याच नाकी नऊ येऊ लागले आहे. कोणी अर्ज दाखल करण्यासाठी पूर्व नोंदणी करू लागले, तर काही गावातील उमेदवार, पॅनल प्रमुख शहर ठिकाणी, तसेच गावातीलच ऑनलाइन केंद्रावर जागरण करीत आहेत.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही, तर निवडणुकीसमोर उमेदवारांना व पॅनल प्रमुखांना कोरोनाची भीती उरलेली नाही. त्यामुळे, खबरदारी म्हणून केंद्रचालकांनी वेळेत सुविधा आणि सोशल डिस्टन्सचे पालन व्हावे यासाठी टोकण पद्धत सुरू केली आहे. या पद्धतीमुळे उमेद्वार दिलेल्या वेळेतच केंद्रात जाऊन आपला अर्ज दाखल करत असल्याने कोरोनाच्या नियमांचे पालन होण्यास मदत मिळत आहे.
हेही वाचा - काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू पकडला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल