गडचिरोली - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी सुरू आहे. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील 11 मजूर तेलंगणातील महादेवपूर या गावी अडकले होते. त्यांना महाराष्ट्र सीमेवरील पोलिसांनी सुखरुप घरी पोहचवले.
तेलंगणा सरकारने अडकलेल्या मजुरांना धान्य आणि 500 रुपये दिले. त्यांची योग्य प्रकारे काळजीही घेण्यात आली. मात्र, असे किती दिवस रहायचे हा विचार करून या मजूरांनी पायीच घरचा रस्ता धरला. गोदावरी नदी पार करून आल्यानंतर सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका येथे महाराष्ट्र पोलिसांनी त्यांनी अडवले. तेव्हा या मजूरांनी घरी जाण्याची मुभा देण्याची विनवणी केली.
पोलिसांनी त्यांना आपल्या कॅम्पमध्ये विलिगीकरण कक्षात आणून ठेवले आणि महसूल विभागाला माहिती दिली. पोलीस आणि महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका खासगी स्पेशल बसमधे बसवुन या मजूरांना पेंटीपाकावरुन भामरागडला पाठवले. भामरगडचे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी या मजूरांची आरोग्य तपासणी करून होम क्वारन्टाईन राहण्याच्या सूचना करून सर्व मजुरांना आपल्या गावी पाठवले.