गडचिरोली - नक्षलवादी बंद पुकारुन सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करतात. 20 मे रोजी नक्षलवाद्यांनी सृजनक्कासाठी बंद पुकारला आहे. कसनसूर दलमची डीव्हिसी सृजनक्का हिच्यावर जिल्हाभरात विविध पोलीस स्टेशनला एकूण 144 गंभीर गुन्हयांची नोंद होती. यामध्ये 34 निष्पाप आदिवासी नागरिकांच्या खुनांसह जनतेच्या पैशातून उभारलेल्या अनेक शासकीय मालमत्तांची जाळपोळीचादेखील समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिक नक्षलवादयांनी पुकारलेल्या बंदला तीव्र विरोध करत 34 निष्पाप आदिवासींचा खून करणाऱ्या सृजनक्कासाठी का म्हणून बंद पाळायचा, असा संतप्त सवाल करीत नागरिकांनी नक्षलवादयांच्या बॅनरची होळी केली.
जिल्हाभरातील नागरिक बंदला प्रतिसाद देणार नाहीत हे नक्षलवादयांना ठाऊक असल्याने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी भ्याड नक्षलवादयांनी बुधवारी सावरगाव हद्दीतील सावरगाव-मुरुमगाव रोडवर मध्यरात्री एका खासगी व्यक्तीच्या मालकीचे 3 हायवा व 1 ट्रक अशा 4 वाहनांची जाळपोळ केली. गेल्या अनेक दिवसांपासुन गडचिरोली पोलीस दल जिल्हयातील नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक नावीन्यपूर्ण योजना राबवित आहे. तर दुसरीकडे नक्षलवादी सातत्याने जिल्ह्यातील नागरिकांसाठी शासन करत असणाऱ्या विविध विकासकामांना विरोध करुन स्वत:च्या फायदयासाठी नागरिकांच्या सर्वांगीण विकासामध्ये आडकाठी निर्माण करत आहेत. अनेक भागांतील नागरिकांना नक्षलवाद्यांचा दुटप्पीपणा लक्षात आल्याने नागरिक नक्षलवाद्यांना उघडपणे विरोध करत आहेत. त्यामुळेच नक्षलवादी अशाप्रकारचे कृत्य करुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
एकीकडे राज्यासह गडचिरोली जिल्हा कोरोना महामारीचा सामना करीत असताना या संकटकाळात पोलीस दलाबरोबरच इतर शासकीय कर्मचारीदेखील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असताना दुसरीकडे याचे काहीही सोयरसुतक नसलेले नक्षलवादी बंदच्या नावाखाली नेहमीच झाडे पाडून रस्ता अडवून सामान्य नागरिकांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध करतात. यामुळे नागरिकांना जीवनावश्यक सेवाबरोबरच आरोग्यसेवा मिळणेही कठीण जाते. आजच्या कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणे अत्यंत गरजेचे असतानाही नक्षलवाद्यांनी मात्र सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे चालूच ठेवले आहे. आपण नागरिकांच्या कल्याणासाठी झटत असल्याचे भासवून त्याआडुन स्वत:चा फायदा साधणे हेच नक्षलवादी आजपर्यंत करत आलेले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 533 सामान्य आदिवासी बांधवांचे खून नक्षलवादयांनी केले आहे. यामध्ये निष्पाप 22 महिलांचाही समावेश आहे. बंदच्या नावाखाली नक्षलवादी जनतेच्या पैशातून उभ्या करण्यात आलेल्या जनतेच्या मालमत्तेचे नुकसान नक्षलवादी करुन सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असतात. बंदच्या नावाखाली आज नक्षलवाद्यांनी खासगी व्यक्तीच्या मालकीच्या गाडया जाळून पुन्हा एकदा सामान्य नागरिकांचे आपल्याला काहीही देणे-घेणे नसल्याची बाब अधोरेखित केली आहे. सध्या जिल्हयात सुरू असलेल्या तेंदुपत्ता हंगामाच्या अनुषंगाने जिल्ह्यात दहशत पसरवून तेंदुपत्ता कंत्राटदारांकडून खंडणी उकळणे हा एकच उद्देश असल्याचे यातून दिसून येत आहे.