चंद्रपूर - 'वेकोली'त थेट परकीय गुंतवणुकीच्या केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात वेकोली कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. त्यामुळे या संपाचा मोठा फटका चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला बसणार आहे. सध्या केवळ दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा केंद्रात शिल्लक आहे. त्यामुळे येणारे दिवस हे वीज केंद्रासाठी कठीण ठरणार आहे.
हे वाचलं का? - उर्जा वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या थकबाकीत ५७ टक्क्यांची वाढ; ७३ हजार कोटींहून अधिक बोजा
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची वीज उत्पादन क्षमता 2 हजार 920 मेगावॅट आहे. सध्या या वीज केद्रात ८ संच सुरू आहेत. सातव्या क्रमांकाचा संच देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या वीज केंद्रातून सध्या १५०० मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. सध्या कोळसा ओला आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी लागतो. दररोज ३० हजार टन कोळशाचा वापर सुरू आहे. एरवी ४० ते ४२ हजार टन कोळसा वीज केंद्राला दररोज लागतो. वीज केंद्राला लागणाऱ्या ७५ टक्के कोळशाची गरज वेकोली पूर्ण करते.
हे वाचलं का? - धडगाव उपविभागात साडेतीन हजार ग्राहकांचे वीज कनेक्शन कापले
यंदा पावसाने सरासरी गाठली. त्यामुळे अनेक भूतळ कोळसा खाणीत पाणी गेले. त्यामुळे खाणीतून कोळसा काढता आला नाही. तसेच रस्ते खराब झाले. त्यामुळे कोळशाचे उत्पादन आणि वाहतूक प्रभावीत झाली आहे. परिणामी वीज केंद्राला पुरेसा कोळसा पुरवठा होऊ शकला नाही. सध्या दोन दिवस पुरेल एवढाच म्हणजे ८२ हजार टन कोळसा वीज केंद्राकडे शिल्लक आहे. त्यातच वेकोलीत थेट परकीय गुंतवणुकीच्या केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात वेकोलीच्या कामगार संघटना संपावर आहेत.
हे वाचलं का? - महावितरणाचा मोठा निर्णय: पुरामुळे नादुरुस्त वीजमीटर स्वखर्चाने बदलून देणार
भारतीय मजदूर संघाने पुढील ५ दिवस कामबंद आंदोलन सुरू केले. मंगळवारला इंटक, आयटक, सीटू, हिंदू मजदूर सभेचे कर्मचारी एक दिवसांचा संप करणार आहे. त्यामुळे कोळसा उत्पादन मोठ्या प्रमाणात प्रभावीत होईल. याचा फटका वीज केंद्राला बसू शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून पाचव्या क्रमांकाचा संच दुरुस्तीसाठी काढला जाणार आहे. वेकोली कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन लांबल्यास वीज केंद्राला कोळशाच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.