चंद्रपूर - हातावर आणून पानावर खायची स्थिती असलेल्या गावखेड्यातील मजूर, कामगारांची लॉकडाऊनमुळे ससेहोलपट सुरू आहे. अशात गावाजवळ असलेल्या शेतात मिरची तोडण्याचे काम मिळाले. मजुरीतून आलेल्या पैशाने कुटुंबाचे काही प्रश्न सुटतील म्हणून त्यांनी घराबाहेर पाऊल टाकले. मात्र येथेही काहींनी कायदा सांगितला. तेव्हा, 'साहेब हातावर पोट आहे..! चुकलो असेल तर माफ करा..! अशी विनंती त्यांनी केली. विशेष म्हणजे तोंडावर रुमाल झाकून त्या मिरची तोडत आहेत. हे काम करताना किमान अंतर राहील याची काळजी ते घेत आहेत.
ग्रामीण भागात शेतातील मजुरीशिवाय फारसे कामे नसे. अशात धानकापणी, रोवणी, कापूसवेचणी ही कामे करून महिला आपल्या संसाराला हातभार लावतात. सध्या मिरचीतोडीचा हंगाम होता. राज्यातील हजारो मजूर तेलंगाणात मिरची तोडायला गेले. पण आपल्या घरी राहून गावातच काम करणाऱ्या मजूर महिलाही आहेत. मिरचीतोडणीचे काम सुरू असतानाचा कोरोनाचे संकट ओढवले आहे. शासनाने लॉकडाउन केला अन् गेल्या आठ दिवसांपासून त्यांचा रोजगार हिरावला. अशात सकमूर परिसरात भारत रेड्डी नावाच्या शेतकऱ्याच्या 9 एकर शेतात मिरचीतोडणीचे काम सुरू झाले अन् महिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
रोज काम करून त्या पैशातून आपले कुटुंब चालविणाऱ्या महिलांची गेल्या आठ दिवसापासून दैना झाली होती. आधीच कोरोना व्हासरसचा धुमाकूळ. या व्हायरसची भीती गावखेड्यातही पसरलेली. कारण, पुणे, मुंबई व इतर शहरात काम करणारे सुरक्षेच्या दृष्टीने गावाकडे परतलेत. अशावेळी शेतात मिरची तोडणीचे काम सुरू करताना मजूर महिला तोंडाला रूमाल झाकून किमान अंतर ठेवून काम करीत आहेत. कोरोनाची भीती आहे. पण प्रश्न पोटाला आहे. काम केले नाही तर चूल पेटणार नाहीच याची जाणीव असल्याने या शेतकरी महिलांनी, 'साहेब सवाल पोटाचा आहे काम तर करावच लागेल', अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सामाजिक भान -
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याचे भान ठेवत या मजूर महिला चांगली काळजी घेत आहेत. तोंडावर रूमालाने झाकून त्या मिरचीतोडीचे काम करीत आहेत. हे काम करित असताना किमान अंतर राहिल याचीही काळजी घेत त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा परिचय देत विनाकारण समुहाने फिरणाऱ्यांना चांगली चपराक लगावली आहे.