चंद्रपूर - शासनाच्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बांधकाम कामगारांची नोंदणी व प्रत्यक्ष लाभ देण्यात दिरंगाई होत आहे. परिणामी चिमूर तालुक्यातील बांधकाम कामगार लाभापासून वंचित आहेत. आपल्या न्याय्य हक्कासाठी बांधकाम कामगार रस्त्यावर उतरले. चिमूर येथील स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांनाही अद्याप कुठल्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही. अनेक ग्रामसेवक नाका प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत. चिमूर जिल्ह्याची निर्मितीकरून त्वरीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सुरू करावे, कामगारांच्या सोईच्या ठिकाणी शिबीर आयोजित करून नोंदणी करावी, राज्यातील नोंदणी अधिकाऱयांना योग्य प्रशिक्षण देवून शंभर टक्के नोंदणी करावी, नोंदणी कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, नोंदणीकृत कामगारांना मासीक सहा हजार पेंशन देण्यात यावी या मुख्य मागण्यांसह एकवीस मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी प्रकाश संकपालांमार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही हे पाठवण्यात आले.
हेही वाचा - आरे कारशेडच्या कामाला स्थगिती; मुख्यमंत्री ठाकरेंची मोठी घोषणा
स्वराज्य बांधकाम संघटनेचे राज्याध्यक्ष धनराज गेडाम, राज्य सचिव देवचंद टेंभूरकर, राज्य कार्यालयीन सचिव नरेश पिल्लेवान, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष बंडू सोणावाने, गडचिरोली जिल्हा सचिव संदीप कीरमीरे, राज्य प्रमुख संघटक गजानन शेडाम, जिल्हा अध्यक्ष रविंद्र गांगले, भाग्यवान नंदेश्वर, तुळशीदास बन्सोड, चिमूर तालुका कोषाध्यक्ष नरेंद्र शेंडे, ताजूल मेश्राम, मनोज राऊत, आकाश भगत हे या आंदोलनाला उपस्थित होते.