बुलडाणा - राज्यातील तिघाडी सरकारला 28 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झाले. हे सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले असून, आपले अपयश झाकण्यासाठी वारंवार केंद्राकडे बोट दाखवले जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवू शकत नाही, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊ शकत नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकत नाहीत. महिलांना व मुलींना संरक्षण देऊ शकत नाहीत. अशी टीका भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी बुलडाण्यात आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये केली. या पत्रकार परिषदेला भाजपचे महामंत्री संतोषराव देशमुख, मोहन शर्मा, योगेंद्र गोडे, प्रदेश प्रतिनिधी विजयराज शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर, जिल्हा महामंत्री अलका पाठक, तालुकाध्यक्ष सुनिल देशमुख, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांची उपस्थिती होती.
सरकारला प्रत्येक आघाडीवर अपयश
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना शिवराय कुळकर्णी म्हणाले की, ठाकरे सरकारने महाराष्ट्राचे एक वर्ष वाया घालवले आहे. सरकारला प्रत्येक आघाडीवर अपयश आले असून, सरकारविरोधोत बोलणाऱ्यांचा आवाज बंद करण्यात येतो. यातूनच अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. तसेच कंगनाचे घर देखील सूड भावनेतून पाडण्यात आले.
वाढीव वीज बिलाबाबत सरकारमध्ये गोंधळ
कोरोनाच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलाबाबत राज्य सरकारने गोंधळाची परिस्थिती निर्माण केली आहे. जनतेला वाढीव वीजबिलात सूट देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, मात्र दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्याचे आणि कार्यालयाचे नुतनीकरण करण्यासाठी सरकारकडे पैसा असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली
महाविकास आघाडीचे सरकार येण्यापूर्वी उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी पंचवीस हजार नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. मात्र स्वतः सत्तेत बसल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आघाडी सरकारने केले आहे. कर्जमाफीची फसवी घोषणा करून शेतकर्यांच्या नावाने राजकारण करण्याचे काम या सरकारकडून होत असल्याने त्यांनी सांगितले.
बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला शिवसेनेकडून तिलांजली
शिवसेनेच्या हिंदुत्वावर बोलताना शिवराय कुळकर्णी म्हणाले की, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला संपुर्णपणे तिलांजली देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी नमाजवर स्पर्धा घेतली जाते, त्यांच्यासाठी हिंदुत्व राहिलेच कुठे असा सवालही त्यांनी यावेळी केला. या सरकारला सर्व आघाड्यांवर अपयश आले असून, ते आपले अपयश लपवण्यासाठी केंद्रावर आरोप करत आहेत. दरम्यान यावेळी ते दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर देखील बोलले. केंद्राकडून करण्यात आलेले सर्व कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असून, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले.