बुलडाणा - दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम त्वरित जमा करण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. मात्र, सरकारने आपला शब्द पाळला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आज (मंगळवार) सकाळी 11.00 वाजेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अचानक ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने प्रशासनात खळबळ उडाली. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा होणार नाही, तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरूच राहील, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांची भेट घेऊन रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात चर्चा केली. तथापि उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होईल? या संदर्भात शासनाचे कोणतेही निर्देश नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितल्यामुळे तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोरच शेतकऱ्यांसह ठिय्या मांडला. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठविले आहे.
नुकसान भरपाईसाठी रविकांत तुपकरांचा आक्रमक पवित्रा या ठिय्या आंदोलनात राणा चंदन, शे.रफिक शे. करीम, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, ज्ञानेश्वर कल्याणकर, सैय्यद वसीम, महेंद्र जाधव, राजेश गवई, दत्ता पाटील, विजय बोराडे,कडूबा मोरे, रामेश्वर पवार, रामेश्वर अंभोरे, आकाश माळोदे, गजानन गवळी,मारोती मेढे, जबीर खान, मनोहर उमाळे, वसुदेव मेढे, लवेश उबरहंडे यांच्यासह शेतकरी व 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते सहभागी झाले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
बुलडाणा जिल्ह्यात या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. या आधीही मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरीप व रब्बी हंगाम वाया गेला होता. त्यातच कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी त्रस्त झाला व बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. या सर्व अडचणींमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला होता. त्यातच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली. दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल, अशी ग्वाही दिली होती. परंतु, आता दिवाळीचा शिमगा झाला तरीही संपूर्ण मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही.
जिल्ह्यात काही अंशी शेतकऱ्यांना मदत मिळाली. परंतु, मोठ्या प्रमाणात शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ ही मदत जमा करण्यात यावी. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीनचे एकरी एक-दोन पोते उत्पादन झाले आहे. परंतु, ते शेतकरी मात्र मदतीपासून वंचित राहले आहेत. अशा शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करून त्यांना मदत मिळणेकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अतिशय तोकडी आहे. या मदतीने शेतकऱ्यांचे काहीही होणार नाही. त्यामुळे अधिकच्या मदतीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा व जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने आणेवारी काढली आहे. तरी अंतिम आणेवारी काढताना वस्तुनिष्ठ आणेवारी काढण्यात यावी. या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हाधिकारी दालनासमोरच खाल्या आंदोलकांनी भाकरी-
सकाळपासून चालू असलेल्या आंदोलनाचा उशिरापर्यंत तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठेचा-भाकर खाऊन आंदोलन सुरूच ठेवले. तर जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या अनेकांनी ठेचा- भाकरींचा आस्वाद घेतला, या आंदोलनाने अनेकांचे लक्ष वेधले.