औरंगाबाद - येथे सोमवारी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली. सकाळी 8 वाजतापासून येथे मतदानाला सुरुवात झाली. यावेळी मतदारांनी येवून आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत युतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि महा आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांच्यात थेट लढत होत आहे.
विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक सोमवारी औरंगाबाद येथे पार पडली. यावेळी एम.आय.एम पक्षाने शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांना पाठिंबा दिल्याच्या चर्चांना शहरात उधाण आले होते. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान युतीचे सदस्य एका बसमधून आले. त्यापूर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अतुल सावे अशी युतीची नेते मंडळी देखील एकत्र आली होती. तर, सदस्यांनी युतीच्या उमेदवाराला समर्थन केल्याची चर्चा होती. ही चर्चा केवळ अफवा असल्याचे खैरे यांनी सांगितले, व युतीचा उमेदवार मोठ्या फरकाने जिंकेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
17 मतदान केंद्रात पार पडली निवडणूक
औरंगाबाद जिल्ह्यात 9 तर जालना जिल्ह्यात 8 असे एकूण 17 मतदान केंद्र राहणार आहेत. या केंद्रापैकी सर्वात जास्त 138 मतदान औरंगाबादच्या तहसील कार्यालयात आहे.
पक्षीय बलाबल
भाजप - 189, शिवसेना - 141, काँग्रेस - 170, राष्ट्रवादी - 80, एम.आय.एम - 28, रिपाई बसपा अपक्ष - 49
एकूण - 657