औरंगाबाद - कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले. आदेशानंतर शहरात पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना अडवून घरीच राहण्याचा सल्ला दिला. राज्यात संचारबंदी लागताच औरंगाबादेतील कन्नड़ शहर पोलीस सतर्क झाले आहेत. आदेश मिळाल्यापासून मुख्य रस्त्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. तसेच विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शनिवार पासूनच बाजार पेठ बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कन्नड येथे जवळपास ८० टक्के व्यवहार बंद करण्यात आले. जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, रविवारी रात्री अनेक नागरिक घराच्या बाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.
हेही वाचा -कोरोना इफेक्ट : राज्यात संचारबंदी लागताच औरंगाबादेत पोलीस सतर्क
सोमवारपासून कलम १४४ लागल्यानंतर जमावबंदी असतानाही अनेक लोक रस्त्यावर आल्याचे दिसून आले. म्हणून संचारबंदी लावल्यानंतर पोलिसांनी आता नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करून प्रत्येकाला घरी जाण्याचा सल्ला पोलीस देत आहेत.
जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठीच बाहेर पडण्याच्या सूचना सोमवारी देण्यात येत आहेत. संचारबंदीची सक्त कार्यवाही करण्यात येत आहे. पोलिस काही ठिकाणी विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना चोप देत आहे.पोलिसांनी कन्नड पिशोर नाका येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. इतकेच नाही तर नियम मोडणाऱ्यांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
हेही वाचा -covid19: औरंगाबाद बस स्थानकात शुकशुकाट; कर्मचाऱ्यांनी केली साफसफाई