कन्नड (औरंगाबाद) - आद्रक भरलेला ट्रक्टर ब्राह्मणी नदी पार करत असताना ट्रॉली पलटी झाली. ट्रॉलीतील तीस क्विंटलच्या जवळपास आद्रक पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील हिवरखेडा गौतळा येथील शिवदास टिकाराम जाधव यांची गट नंबर ८२ मध्ये शेती असून त्यांनी आपल्या शेतात आद्रकचे पिक घेतले होते.
दिवसभर मजुरांनी आद्रक खोदून ते ट्रॉलीमध्ये भरले होते. आद्रक धुण्यासाठी नियोजित जागी ट्रक्टरद्वारे नेले जात होते. गौतळा अभयारण्यात दुपारी जोरदार पाऊस झाला होता. यामुळे अचानक नदीच्या पाण्यात वाढ झाली, त्याच वेळी ट्रॉली पलटी झाल्याने काही उपाय योजना करण्याच्या आतच डोळ्यासमोर आद्रक वाहून गेले. हे दृश्य पाहून शेतकऱ्याचा मुलगा भोवळ येवून जमिनीवर पडला.
हेही वाचा - औरंगाबाद : शिवना नदीच्या पुलावरुन उडी घेत अज्ञात महिलेची आत्महत्या
संबंधित शेतकऱ्याच्या शेतात जाण्या-येण्यासाठी रस्ता नसल्याने नदीच्या पाण्यातूनच जावे लागते. बारा महिने सांभाळ केलेले आद्रक पिक पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्याच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. शेतात मागील वर्षी जून महिन्यात एक एकर आद्रकची लागवड केली होती. लॉकडाउन सुरू असल्याने उन्हाळ्यात आद्रक काढता आले नाही. त्यात मागील महिन्यात झालेल्या सततच्या पावसाने काही आद्रक कुजून गेले. यामुळे झालेला खर्च कसाबसा निघणार होता, त्यात ट्रॉली पलटी झाल्याने संपूर्ण नुकसान झाले असल्याची माहिती शेतकऱ्याच्या मुलाने दिली. याबाबत नुकसान भरपाई मिळण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.