औरंगाबाद - उपमहापौर पदाची निवडणूक 31 डिसेंबर रोजी पार पडणार असून त्यासाठी 6 उमेदवारांनी 10 अर्ज भरले आहेत. यामध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस उमेदवारांचा समावेश आहे.
हेही वाचा- केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकरदात्यांना दिलासा मिळणार; अनुराग ठाकूर यांचे संकेत
महानगरपालिका निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना पाणी पुरवठा योजनेच्या मुद्द्यावरून भाजपचे विजय औताडे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातील नव्या आघाडीचे गणिते महानगर पालिकेत जुळवण्यासाठी काँग्रेसतर्फे हालचाली सुरू केल्या जात आहेत. त्यामुळे उपमहापौर पदावर काँग्रेसने दावा केला आहे. महापौरपद असलेल्या शिवसेनेने देखील उपमहापौर पदासाठी अर्ज भरले आहेत. तर नव्या महाविकास आघाडीचे समीकरण महानगरपालिकेत राबवले जावे, असा आग्रह काँग्रेसने केला आहे. तसे झाले तर त्यासाठी खबरदारी म्हणून कॉंग्रेसने देखील अर्ज दाखल केले आहेत. भाजपने पाण्याच्या मुद्द्यावरून उपमहापौर पद सोडले असले तरी त्यांच्या वतीने देखील अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
यांनी भरले उपमहापौर पदाचे अर्ज
शिवसेना - राजेंद्र जंजाळ आणि सुरेखा सानप
भाजप - कैलास गायकवाड आणि गोकुळ मलके
काँग्रेस - अफसर खान आणि शबनम बेगम
शिवसेना पक्ष प्रमुखांनी अद्याप निवडणुकीबाबत कुठल्याही सूचना दिलेल्या नसल्या तरी खबरदारी म्हणून अर्ज भरले असून पक्षाचे आदेश येतील तसेच निर्णय घेतला जाईल. नवीन आघाडी राज्यात उदयास आली आहे. त्याप्रमाणे काही समीकरण जुळवण्याचे आदेश मिळाले तर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.