अमरावती - शिक्षण क्षेत्रातील बदल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षण विभागामार्फत शिक्षणोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भातकुली तालुक्यातील विविध शाळेतील शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित केलेल्या या उपक्रमात सादरीकरण केले.
शिक्षण क्षेत्रात झालेले आधुनिकीकरण, लोक सहभागातून झालेला कायापालट आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती शिक्षकांसह सर्वसामान्यांना व्हावी या उद्देशाने शिक्षणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मागील वर्षीपर्यंत राज्यस्तरीय आणि प्रादेशिक स्तरावर 'शिक्षणाची वारी' या उपक्रमाचे आयोजन होत होते. परंतु या माध्यमातून मोजक्याच शिक्षकांना संधी मिळात असे. त्यामुळे यावर्षी शिक्षणोत्सवाचे आयोजन केले गेले.
हेही वाचा - जिल्ह्यातील जंगलात गारपिटीने तब्बल ५ हजाराहून अधिक पोपटांचा मृत्यू
या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील पंचवीस ते तीस शिक्षकांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेत भातकुली तालुक्यातील अनेक शाळेतील शिक्षकांनी वर्गांमध्ये राबवत असलेले उपक्रम शिक्षण सर्वांसमोर सादर केले. गणित-इंग्रजी हे कठीण वाटणारे विषय विद्यार्थ्यांना सोपे करून कसे शिकवता येतील, याच्या विविध पद्धती येथे सादर करण्यात आल्या. विविध शिक्षकांच्या कल्पना इतर शिक्षकांना लाभदायी ठराव्यात हा सुद्धा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे यांनी भातकुली तालुक्यातील शिक्षकांनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण शिक्षण उत्सवात केले, असल्याची माहिती दिली.