अमरावती - येथील राजकमल चौकात महापालिकेच्या संकुलात असणाऱ्या निखिल मोबाईल शॉपीला गुरुवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या एकूण ३ बंबाद्वारे या आगीवर नियंत्रण आणण्यात आले. या आगीत ४५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
शहरातील मध्यभागी असणाऱ्या राजकमल चौक येथील नेहरू मैदानाला लागून असलेल्या महापालिकेच्या व्यापारी संकुलातील एका मोबाईलच्या दुकानाला आग लागली. या संकुलात व्यापारी बख्तार यांच्या मालकीचे निखिल मोबाईल शॉपी असे दुकान आहे. गुरुवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे दुकानाच्या वरच्या मजल्यावर आग लागली. काही वेळातच २ मजली असणारे हे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या घटनेत दुकानातील एकूण ४५ लाख रुपयांचे मोबाईल फोन जळून खाक झाल्याची माहिती निखिल मोबाईल शॉपीचे संचालक बख्तार यांनी दिली. मात्र, भर चौकात लागलेल्या आगीमुळे चांगलीच खळबळ उडाली होती.
हेही वाचा - महावितरण कर्मचाऱ्यांच्या वारसांवर उपासमारीची वेळ...नोकरीसाठी उपोषण सुरू
हेही वाचा - विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस