अमरावती - कोरोना लस बुधवारी मध्यरात्री अमरावती येथे येऊन पोहोचली. सध्या सुमारे 17 हजार लसींचा डोस जिल्ह्याला प्राप्त झाला असून तो शीतसाखळी केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. 16 जानेवारीला लसीकरणाचा शुभारंभ होणार असून त्यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
रात्री दोन वाजता पोहोचली लस -
लस घेऊन येणारे वाहन अकोल्यावरून काल रात्री 2 वाजेच्या सुमारास जिल्ह्यात येऊन पोहोचले. यावेळी जिल्हा आरोग्य यंत्रणेने आनंद व्यक्त करत त्याचे स्वागत केले. त्यानंतर या लसी शीतसाखळी केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आल्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही सकाळी लसवाहिका व शीतसाखळी केंद्राची पाहणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्या अनेक आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
लसीकरणासाठी यंत्रणा सुसज्ज -
कोरोनाविरुद्ध जवळजवळ वर्षभरापासून लढाई सुरु आहे. आता हा लढा निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. लस प्राप्त झाल्यामुळे एक महत्त्वाची उपलब्धी झाली आहे. तसेच लसीकरणाच्या शुभारंभदिनासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी सांगितले.
शनिवारी पाच ठिकाणी होणार लसीकरण -
शासनाच्या सूचनेनुसार लसीकरण केंद्राच्या संख्येत नव्याने बदल करण्यात आला आहे. आता याकरिता पाच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्हा सामान्य रूग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या पाच केंद्रांवर लसीकरण होईल. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी 500 लाभार्थ्यांना लस दिली जाईल. याच लाभार्थ्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. लसीकरणासाठी नोंदणी आवश्यक असते. त्यानुसार संबंधित नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात १६ हजार २६२ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होईल, अशी माहिती डॉ. रणमले यांनी दिली आहे.
हेही वाचा - राजस्थानात विषारी दारू प्यायल्याने ७ जणांचा मृत्यू