अहमदनगर : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डी.सी.पी.एस. धारक कर्मचारी 14 मार्च पासून संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन योजना लागु व्हावी या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन त्यांनी सुरु केले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठात अधिकारी, कर्मचाऱ्यांची 4 हजार 520 पदे मंजूर असून त्यातील 2 हजार 349 पदे भरलेली आहेत. त्यापैकी 1 हजार 450 कर्मचारी हे डी.सी.पी.एस. धारक आहेत. त्यापैकी विद्यापीठातील 50 टक्के कर्मचारी कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे.
विद्यापीठाचे कामकाज ठप्प : या कामबंद आंदोलनाचा विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन, विस्तार, प्रशासन तसेच विकास कामावर परिणाम झाला आहे. या आंदोलनामध्ये कृषि सहाय्यक संघटना, लिपीक वर्गीय संघटना, मागासवर्गीय सेवक संघटना, प्राध्यापक संघटना असे सर्व मिळून कर्मचारी मध्यवर्ती समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली संप करण्यात येत आहे. त्यांना पाठिंबा म्हणून जुने पेन्शनधारक अधिकारी, कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनास पाठिंबा दिला आहे. एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देवून विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला आहे.
प्राणायम करुन हे आंदोलन सुरु : सरकारला लवकर जाग यावी यासाठी कर्मचार्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी ध्यानधारणा, प्राणायम करुन हे आंदोलन सुरु ठेवले आहे. यावेळी कर्मचार्यांनी विद्यापीठाचे कुलसचिव, राहुरीचे तहसीलदार यांना मागणीचे निवेदन दिले आहे. डी.सी.पी.एस. धारक कर्मचारी एकच मिशन जुनी पेन्शन अशा आशयाच्या टोप्या घालून विद्यापीठ परिसरामध्ये रोज रॅली काढत आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर यांचे मार्गदर्शनाखाली हे आंदोनल यशस्वीरित्या चालु आहे. ध्याणधारना, प्राणायम करुन विद्यापीठाच्या कर्मचार्यांचे अनोखे आंदोलन करत आहेत. आंदोलन करते रोज प्राणायाम करत असल्याचे पाहून या आंदोलनाची चर्चा सध्या राहुरी परिसरात सुरू आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांची प्रकृती या प्राणायाम केल्यामुळे नक्की शुधरेल अशी चर्चा देखील सुरू आहे.