अहमदनगर - अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या ( Ahmednagar District Co-operative Bank ) लेखापरीक्षण विभागाला नविन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आग लागली. आगेत कागदपत्रे जळून खाक झाले असून सदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. आग पंख्यात झालेल्या शार्टसर्किटमुळे लागली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या जिल्हा उपनिबंधक कार्यालया शेजारील लेखापरीक्षण विभागाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. ही घटना शुक्रवारी (दि. 1 एप्रिल) सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली. सायंकाळी सहा वाजता जिल्हा सहकारी बँकेतील जिल्हा उपनिबंधक कार्यालय व लेखा परीक्षण विभागातील कर्मचारी कार्यालय बंद झाल्याने घरी गेले. जिल्हा सहकारी बँक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मोजकेच कर्मचारी होते. लेखा परीक्षण विभागातील सर्व कर्मचारी घरी निघून गेले होते. सायंकाळी पावणेसात वाजता लेखा परीक्षण विभागातून धूर येत असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने पाहिले. त्यांनी तातडीने वरिष्ठांना याबाबत माहिती दिली.
अहमदनगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी सर्व प्रथम आला. मात्र आग चौथ्या मजल्याला लागली होती. तेवढी उंच शिडी व पाईप अग्निशमन विभागाकडे नाहीत. त्यामुळे पाईप आगीपर्यंत जाईना तसेच एक बंब पाणी फवारुनही आग अटोक्यात येईना. त्यानंतर एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी आला. अद्ययावत उपकरणे असलेल्या या अग्निशमन पथकाने आगावर तातडीने नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत लेखा परीक्षण विभागातील कागदपत्रे जळून गेली होती. घटनेची माहिती मिळताच जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजी कर्डिले, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे घटनास्थळी पोहोचले.
जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी बँकेत आल्यावर घटना का व कशी घडली हे पाहण्यासाठी लेखा परीक्षण कार्यालयातील सीसीटीव्ही तपासले. यामध्ये एका टेबल जवळील फॅनच्या विद्युतारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे निष्पन्न झाले.
सायंकाळी सहानंतर कार्यालय सुटल्यावर बरेच कर्मचारी घरी गेले होते. लेखा परीक्षण कार्यालयातील सर्व कर्मचारी घरी गेले असताना ही आग लागल्याने जीवित हानी झाली नाही. लेखा परीक्षण कार्यालयातील कागदपत्रे जरी जळाली असली तरी या कागदपत्राच्या प्रती नाबार्ड, जिल्हा बँकेच्या शाखा, विविध सहकारी संस्था, सहकार विभागाची वरिष्ठ कार्यालये आदींत असतात. त्यामुळे आगीत नष्ट झालेली माहिती पुन्हा मिळविता येईल, अशी माहिती जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली आहे.
हेही वाचा - साईबाबांना सोन्याच्या अलंकारासह साखरेच्या गाठीचा श्रुंगार, मंदिरावरच्या कलशावर उभारली गुढी