अहमदनगर - 'वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिलेला नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिलेले असताना भाजपकडून राजीनाम्याची मागणी होत आहे. हे भाजपच्या हातून सत्ता गेल्याने ते अस्वस्थ झाल्याने होत आहे. काहीही झाले की बदनाम करायचे, टीका करायची हे त्यांचे धोरण आहे', असा पलटवार राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्यावरही असेच आरोप झाल्यावर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली होती. मात्र, संबंधित महिलेनेच आपले आरोप मागे घेतल्याची जोडही मुश्रीफ यांनी यावेळी दिली.
जिल्हा पोलीस मुख्यालयात आज मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलासाठी वीस पोलीस वाहनांचे हस्तांतरण करण्यात आले. या वेळी, माध्यमांशी बोलताना त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर हे भाष्य केले. तीर्थक्षेत्र पर्यटन मदत केंद्र आणि जिल्हा नियोजन निधीतून ही वीस वाहने पोलीस दलासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात शिर्डी, शनिशिंगणापूर, देवगड, मेहरबाबा, भंडारदरा आदी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन क्षेत्रे आहेत.
ईडी-इनकम टॅक्स चौकशांमागे फडणवीस
महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडी, प्राप्तीकर चौकशी लावण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा गंभीर आरोप हसन मुश्रीफ यांनी या वेळी केला. जे कोणी भाजपच्या विरोधात जाईल, त्यांच्यावर लगेच ईडी, प्राप्तीकर विभागाच्या चौकशा सुरू होत आहेत. प्रताप सरनाईक, आनंद अडसूळ यांच्यासह माझ्यावर या चौकशा लावल्याने फडणवीस यामागे असल्याची आपली पक्की खात्री झाल्याचे मुश्रीफ म्हणाले.