अहमदनगर - कामरगाव येथील सुवर्णज्योत हॉटेल जवळ अहमदनगर - पुणे महामार्गावर दुचाकी-ट्रकमध्ये अपघात झाला. या अपघातानंतर कागदांच्या रीळने भरलेला ट्रक जळून खाक झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
नगर-पुणे महामर्गावर कामरगाव जवळ दुचाकी आणि ट्रक (एम एच -१९ झेड ४३१८)चा अपघात झाला. या अपघातात मोटारसायकल ट्रकखाली अडकून फरफटत गेल्याने ट्रकने पेट घेतला. आग लागल्याचे ट्रक चालकाच्या लक्षात येताच त्याने ट्रक थांबविली. कामरगाव ग्रामस्थांनी अग्निशमन विभागाला ट्रक पेटल्याची माहिती दिली. तसेच पोलिसांनाही माहिती दिली. ट्रकमध्ये कागदाचे मोठे रीळ असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. आगीत ट्रक पूर्ण जळून खाक झाली. या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. दरम्यान, अग्निशमनची गाडी घटनास्थळी दाखल झाली व त्या गाडीने पेटती ट्रक विझवली. या घटनेमुळे सुमारे दीड तास नगर-पुण्याकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. ट्रक विझविल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळित केली.