इंदूर - सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने उत्तर प्रदेशवर ४६ धावांनी विजय मिळवला आहे. काल झालेल्या सामन्यात मुंबईने विदर्भावर ६ गडी राखून मात केली होती. मुंबईकडून सिद्धेश लाडने अष्टपैलू खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
या सामन्यात उत्तर प्रदेशच्या संघाने नाणेपफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीस आलेल्या मुंबईच्या संघाने शानदार खेळी करत निर्धारीत २० षटकांमध्ये ७ गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावांचा डोंगर उभारला. मुंबईकडून एकनाथ केरकरने ४६, सिद्धेश लाडने ६२ तर तर कर्णधार श्रेयस अय्यरने ४३ धावांची खेळी केली. उत्तर प्रदेशकडून कर्णधार अंकित राजपूतने सर्वाधिक ३ विकेट घेतलेत.
विजयासाठी १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशचा संघ अवघ्या १३७ धावांवर गारद झाला. उत्तर प्रदेशच्या ६ फलंदांजाना तर दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. मुंबईकडून शार्दुल ठाकूर, शिवम दुबे आणि सिद्धेश लाड यांनी प्रत्येकी ३ गडी गारद केलेत. तर तुषार देशपांडेला १ गडी बाद करता आला.