मुंबई - कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या सत्राच्या आयोजनाबाबत बीसीसीआयचे मत विभागले गेले आहे. काहींनी ही स्पर्धा भारतात तर काहींनी भारताबाहेर खेळवण्याची मागणी केली. परंतू आयपीएलच्या फ्रेंचायझींनी ही स्पर्धा भारतातच व्हावी असे मत दिले आहे. भारतात परिस्थिती सुधारली नाही तर बाहेरच लीगचे आयोजन करणे हा एक उपाय ठरू शकतो, असे आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी म्हटले.
ही स्पर्धा फक्त फ्रेंचायझीसाठीच महत्त्वाची नाही, तर देशातील कोट्यावधी क्रिकेट प्रेमींसाठी आयोजित करणे महत्त्वाचे असल्याचे आयपीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते. "जेव्हा आपण देशाबाहेर आयपीएल घेतो तेव्हा लोकांमध्ये जाणाऱ्या संदेशाबद्दल विचार करा. क्रिकेट हा इथला एक धर्म आहे आणि आयपीएलचा भारतावर झालेल्या सकारात्मक परिणामाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आता, लॉजिस्टिकल भागाचे सांगायचे झाले तर, भारतात आम्हाला फक्त परदेशी खेळाडूंची आवश्यकता आहे. प्रवेश घेण्यापूर्वी त्यांना क्वारंटाईन ठेवणे आवश्यक आहे. पण जर आपण बाहेर जात असू तर प्रत्येक संघाला म्हणजे सुमारे 25-30 लोकांना क्वारंटाईन ठेवावे लागेल'', असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
"2009 मध्ये जेव्हा ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत घेण्यात आली होती तेव्हा त्याचा आर्थिक परिणाम वर्षभर जाणवला. फ्रेंचायझी आणि बीसीसीआय यांच्यातील गोंधळ विसरून चालणार नाही. 2014 मध्ये युएई आयपीएलचा भाग होता. पण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता तुम्ही आयपीएलच्या अर्ध्या सामन्यांनाही बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. तसेच, आपल्याला हे देखील लक्षात घ्यावे लागेल की फ्रेंचायझी किंवा बीसीसीआयने आयपीएलला परदेशात नेण्याचा प्रस्ताव दिला नव्हता. निमंत्रण पाठवणारे हे विदेशी बोर्ड आहेत. फ्रेंचायझी म्हणून आम्हाला नक्कीच इंडियन प्रीमियर लीग हवे आहे. आयपीएल भारतात आयोजित केली जाईल कारण त्यांची ओळख या देशाशी जोडली गेली आहे. डेस्टिनेशन वेडिंग तेव्हाच होईल जेव्हा आपले मित्र आणि कुटुंब आपल्यासमवेत हा क्षण साजरा करण्यासाठी उपस्थित असतील. पण ते नसताना काही होणार नाही,'' असेही दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले.