मुंबई - टेलिव्हिजन मालिका अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होतात. या मालिकांमध्ये साहजिकच नायक तसेच खलनायकही असतात. प्रेक्षकांना खल प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या आवडत्या व्यक्तिरेखांना त्रास दिला की दातओठ खातात. परंतु एक गोष्ट अशी की खलनायिका वाईट तेवढीच नायिका प्रेक्षकप्रिय होते. पूर्वी खलनायिकांच्या नावाने बोटं मोडली जायची. परंतु, आता जमाना बदलला आहे. आणि प्रेक्षकही सुज्ञ झाला आहे. मालिकेतील व्यक्तिरेखा जरी वाईट असली तरी ती भूमिका निभावणारी अभिनेत्री वाईट नाहीये.
नेहमी सकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती सारंगधर झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत प्रथमच खलनायिका साकारतेय. यासाठी प्रेक्षकांकडून भरगोस प्रतिसाद देखील मिळतोय. या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. आणि त्यांनी या मालिकेवरच नाही तर त्यातील व्यक्तिरेखांवर देखील प्रेमाचा वर्षाव केला आहे. शकू, नलू, ओम, स्वीटू, चिन्या, रॉकी आणि मालिकेतील सर्व पात्रही प्रेक्षकांना आपलीशी आणि आपल्यातलीच एक वाटतात. इतकंच काय तर या मालिकेतील खलनायिका म्हणजेच मालविका या व्यक्तिरेखेला देखील प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे.ही लोकप्रिय नकारात्मक व्यक्तिरेखा आणि त्याला मिळणारा प्रतिसाद याबद्दल बोलताना अदिती म्हणाली, "सुरुवातीला मालविकाचं पात्र साकारताना मला अक्षरशः रडू यायचं. कारण अशा प्रवृत्तीची माणसं मी माझ्या आजूबाजूला कधी पाहिली नाहीत. पण हळू हळू ते पात्र मी समजू लागले. माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका निभावतेय. नकारात्मक भूमिकाच करायची आहे असं मी ठरवलं नव्हतं. पण कुटुंबासाठी वेळ आणि चित्रीकरणाचे तास हे गणित जुळवून काम करण्याची इच्छा होती.”अदिती पुढे म्हणाली, “मालविका ही एक कणखर आणि बेधडक व्यक्ती आहे. मालिकेत जरी माझी भूमिका नकारात्मक असली तरीही त्यातून शिकण्यासारखं बरच काही आहे. 'घरातल्या व्यक्तींशी कसं वागू नये' हे दाखवण्याचं काम मालविकाने केलं आहे. आता मला हे पात्र साकारताना खूप मजा येते. प्रेक्षक मालविकाचा जितका तिरस्कार करतात, तितकंच किंबहुना त्याहूनही जास्त मालविकाचं कौतुक करतात.हेही वाचा - Raju sapate suicide : लेबर युनियनच्या जाचाला कंटाळून कलादिग्दर्शक राजू सापतेंची आत्महत्या