सध्या सिक्वेल्सचा जमाना आहे. अनेक हिंदी-मराठी चित्रपटांचे सिक्वेल्स आणि पुढील भाग तयार होताहेत. एखादा चित्रपट प्रेक्षकप्रिय झाला की शक्यतो त्याचा दुसरा भाग काढणे सध्या ‘फॅशन’मध्ये आहे. साधारण चारेक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘भेटली ती पुन्हा’ हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षक यांना आवडला होता. आता त्याचा दुसरा भाग येऊ घातलाय, ‘भेटली ती पुन्हा २. "भेटली तू पुन्हा" हा चित्रपट लिहिणारे संजय जमखंडी "भेटली ती पुन्हा २" चे लेखन करत आहेत. आता सिक्वेल होताना चित्रपटाच्या कथेने काय वळण घेतले आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अतिशय हलकीफुलकी कथा, वैभव तत्ववादी, पूजा सावंत यांचा नैसर्गिक अभिनय, दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांचे उत्तम दिग्दर्शन, नेत्रदीपक तांत्रिक बाजू आणि "हरवू जरा....", "जानू जानू...." अशी उत्तमोत्तम गाणी यांचा मिलाफ "भेटली तू पुन्हा" या चित्रपटात झाला होता. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही लाभला होता. या सीक्वेल मधून अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे.
देवी सातेरी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप स्टुडिओज याचित्रपटाची निर्मिती करणार असून गिरीश परब, आकाश पेंढारकर, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर "भेटली ती पुन्हा २” या सिक्वेलद्वारे आजवर अनेक मालिकांचे दिग्दर्शन केलेले सुप्रसिद्ध दिग्दर्शक जयंत पवार हे सिनेदिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहेत.
"भेटली तू पुन्हा" या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर केली आहे.
हेही वाचा - आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर