मुंबई - 'हिमालयाची सावली' हे नाटक १९७२ साली तुफान गाजलं होतं. या नाटकातील ज्येष्ठ अभिनेत्री शांता जोग यांच्या अभिनयाने सजलेली 'बयो' ही व्यक्तिरेखादेखील लोकप्रिय ठरली होती. आता हेच नाटक लवकरच नव्या साच्यात रंगभूमीवर येणार आहे. या नाटकात अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई या 'बयो'च्या भूमिकेत झळकणार आहे. शृजा प्रभूदेसाईने नाटक आणि मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
मात्र, ‘बयो’ या व्यक्तिरेखेतून एका वेगळ्या रुपात रंगमंचावर दिसणार आहेत. त्यांच्या सोबत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे या नाटकात नानासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे.
हेही वाचा-हासू आणि आसू यांचा मिलाफ असलेला 'द स्काय ईझ पिंक' ट्रेलर अखेर रिलीज
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना शृजा सांगतात की, ‘अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी ही आव्हानात्मक भूमिका आहे. या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे कंगोरे साकारण्यात आव्हान असले तरी या व्यक्तिरेखेतून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहेत. माझ्या वयापेक्षा अधिक वयाची ही भूमिका असल्याने त्यासाठी आवश्यक भाव, देहबोली या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ही भूमिका करायची होती. 'बयो' आणि मी स्वतः कोकणातली असल्यामुळे तिची भाषा आणि लकबी पकडणं मला सोयीचं होत आहे. नाट्यरसिकांना ही भूमिका आवडेल, असा विश्वास शृजा व्यक्त करतात.
![shruja prabhudesai will seen in role of bayo in himalayachi sawali play](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-02-shruja-as-bayo-7206109_10092019222738_1009f_1568134658_941.jpg)
दिग्दर्शक राजेश देशपांडे, अभिनेते शरद पोंक्षे यांचे अमूल्य मार्गदर्शन इतर सहकलाकारांची उत्तम साथ या सगळ्यांमुळे मला वेगळ्या स्तरावर नेणारी भूमिका साकारणं शक्य झाल्याचं त्या आवर्जून सांगतात.
प्रा.वसंत कानेटकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये रविवार २९ सप्टेंबरला ‘हिमालयाची सावली’ नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. या नाटकात ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, शृजा प्रभूदेसाई, जयंत घाटे, विघ्नेश जोशी, कपिल रेडकर, ओमकार कर्वे, कृष्णा राजशेखर, प्रकाश साबळे, मकरंद नवघरे, वासंतिका वाळके, पंकज खामकर यांच्या भूमिका आहेत.
हेही वाचा-'ड्रीमगर्ल'ला भेटण्यास मुन्नाभाई उत्सुक, प्रपोजचा व्हिडिओ व्हायरल
प्रकाश देसाई प्रतिष्ठान (पाली) व अद्भुत प्रॉडक्शन्स निर्मित व सुप्रिया प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या या नाटकाचे प्रस्तुतकर्ते गोविंद चव्हाण व प्रकाश देसाई आहेत. संगीताची जबाबदारी राहुल रानडे तर कलादिग्दर्शन संदेश बेंद्रे यांचे असणार आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. निर्मिती सूत्रधार सुभाष रेडेकर आहेत. अंजली आणि अंशुमन कानेटकर यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे.