मुंबई - २०२० हे वर्ष बॉलिवूडसाठी कॅलेंडरमधील सर्वात दुर्दैवी वर्ष मानावे लागेल. नवीन वर्षाची सुरूवात झाली आणि अनेक नवे संकल्प घेऊन निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ यांनी नव्या दमाने सुरूवात केली. त्याचवेळी कोरोनाचे संकट जगभर सुरू झाले आणि भारतात लॉकडाऊन सुरू झाले. याचा सर्वात मोठा फटका बॉलिवूडला बसलाय. शेकडो निर्माणाधिन चित्रपटांचे सुटिंग थांबले, नव्या घोषणाथांबल्या, तयार चित्रपटांना थिएटर्स नाहीत, नवी पदार्पणे थांबली. अशी मोठी संकटे असतानाच रुपेरी पडद्यावर अजरामर कलाकृती निर्माण करणाचे दिग्गज प्रतिभावंत आपल्याला कायमचे सोडून गेले. आपण अशा कलाकारांचे स्मरण करुयात आणि त्यांना श्रध्दांजलीही वाहूयात.
सौमित्र चटर्जी

प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे सौमित्र चटर्जी यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. निर्माते-दिग्दर्शक सत्यजीत रे यांचे ते आवडते अभिनेते म्हणून ओळखले जात होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सत्यजीत रे यांच्या 'अपुर संसार' या सिनेमातून त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. सौमित्र चटर्जी यांना चित्रपटसृष्टीतील आपल्या योगदानासाठी २००४ साली पद्मभूषण तर २०१२ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
इरफान खान

आपल्या सहज सुंदर अभिनयाने व्यक्तीरेखा जिवंत करणारा अभिनेता इरफान खान यांच्या निधन झाल्याच्या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. इरफान गेल्या दोन वर्षांपासून न्यूरो इंडोक्राईन ट्युमरने आजारी होते. त्यांच्यावर उपचारानंतर ते अलिकडेच भारतात परतले होते. गेल्या काही दिवसापासून ते भारतात डॉक्टरांच्या निगराणीखाली वावरत होते. देशभरात लॉकडाऊन सूरु असल्याने त्याच्या दैनंदिन उपचारामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्याने अधिक दक्षता घेण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या उपचारा दरम्यान त्यांना मृत्यूने गाठले.
गेली दोन वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर राहिलेल्या इरफान यांना पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. ठरल्या प्रमाणे 'अंग्रेजी मीडियम' थिएटरमध्ये रिलीज झाला. दरम्यान कोरोना व्हायरसाचा संक्रमणाचा काळ सुरू झाला होता. त्यामुळे भारतात लॉकडाऊन करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. त्यामुळे थिएटरमध्ये लागलेला अंग्रेजी मीडियम लोकांना पाहताच आला नाही. अखेरीस ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता.
त्यांनी अनेक नाटकांसोबतच हिंदी, इंग्रजी सिनेमाधूनही अभिनय केला. ए माइटी हार्ट, स्लमडॉग मिलियनेयर आणि द अमेजिंग स्पाइडर मॅन या हॉलिवूड चित्रपटात ते झळकले. सुमारे ७० चित्रपटातून त्यांनी अभिनय केला. 'लाइफ इन अ मेट्रो', 'पानसिंग तोमर', 'द लंचबॉक्स', 'हैदर', 'गुंडे', 'पिकू', 'तलवार', 'हिंदी मीडियम' यांसारख्या चित्रपटांमध्ये इरफानने दमदार भूमिका साकारल्या होत्या. अंग्रेजी मीडियम हा चित्रपट त्यांच्या अखेरचा चित्रपट ठरला.
इरफान खान यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २००८ मध्ये 'लाइफ इन अ... मेट्रो' या चित्रपटासाठी त्यांची निवड फिल्मफेअर पुरस्कारासाठी झाली होती. २००४ मध्ये त्यांनी 'हासिल' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारही मिळवला होता. २०११ मध्ये त्यांना भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
ऋषि कपूर

अभिनेता इरफान यांच्या निधनाने सिनेजगतात शोककळा पसरली होती. त्यांच्यापाठोपाठ आता ऋषी कपूर यांचेही निधन झाल्याने सिनेसृष्टीला धक्का बसला.ऋषी कपूर यांनी १९७४ साली 'बॉबी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्याच्या रुपात एन्ट्री घेतली होती. त्यापूर्वी 'मेरा नाम जोकर' या चित्रपटातून बालपणीच त्यांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती.त्यांची पहिली वहिली मुख्य भूमिका असलेल्या 'बॉबी' चित्रपटानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.त्यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये 'दामिनी', 'दो दुनी चार', 'कर्ज', 'प्रेमरोग', 'चांदनी', 'यादों की बारात', 'प्रेम ग्रंथ', 'पटियाला हॉउस', 'अग्निपथ', 'कपूर अँड सन्स' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.ऋषी कपूर यांनी 'खुल्लम खुल्ला' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.ऋषी कपूर यांना २०१८ साली पहिल्यांदा कर्करोग असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर जवळपास ८ महिने न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ऋषी कपूर किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही या आजाराबाबत खुलासा केला नव्हता. नंतर त्यांनी स्वत: आपल्या चाहत्यांना या आजाराबाबत माहिती दिली होती. ऋषी कपूर यांना कर्करोगाशी संबंधीत समस्या होती. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. बुधवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील एनएच रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सुशांत सिंह राजपूत

यावर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले.
सुशांतचा जन्म बिहारच्या पाटण्यात २१ जानेवारी १९८६ झाला. सुशांतने मॅकेनिकल इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केले होते. सुशांत सिंह राजपूतने त्याच्या करीअरची सुरुवात 'किस देश मे है मेरा दिल' या मालिकेतून केली. मात्र, 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून सुशांत घराघरात पोहोचला. ती मालिका अर्ध्यावर सोडून सुशांतने त्याची पावले मोठ्या पडद्याकडे वळवली. सुशांतने 'कायपो चे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने शुद्ध देसी रोमांस, पीके, धोनी द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, सोनचिढीया आणि छिछोरे यासारख्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. ओटीटीवर रिलीज झालेला दिल बेचारा हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.
वाजिद खान

बॉलिवूडची प्रसिद्ध साजिद-वाजिद जोडी इंडस्ट्रीमधील संगीतासाठी प्रसिद्ध होती. पण १ जून रोजी ही जोडी फुटली. आपल्या मृत्यूच्या काही दिवस आधी वाजीद यांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले होते. याचा संसर्ग झाल्याचे सांगितले जाते. परंतु मीडियातील काही घटकांना त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे वाटते.
बासु चटर्जी

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक बासु चटर्जी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी ४ जून रोजी निधन झाले. बसू चॅटर्जी हिंदी चित्रपट तसेच बंगाली चित्रपट आणि टीव्ही मालिका यासाठी परिचित होते.
सरोज खान

बॉलिवूडच्या दिग्गज नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांचे हृदयविकाराच्या कारणामुळे २ जुलै रोजी निधन झाले. बाल कलाकार म्हणून सरोज खान चित्रपटाच्या जगाशी संबंधित होत्या. नंतर त्या कोरिओग्राफर बनल्या आणि नंतर त्यांना गीता मेरा नाम पासून स्वतंत्र नृत्यदिग्दर्शक म्हणून ब्रेक मिळाला. मिस्टर इंडियाच्या हवा हवा गाण्याने सरोज यांना ओळखले गेले.
जगदीप

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जगदीप यांचे त्यांच्या वयाच्या ८१ व्या वर्षी ७जुलैला निधन झाले. जगदीप यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला ठसा उमटवला होता. शोले चित्रपटातील सुरमा भोपाली ही त्यांची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे.
त्यांनी सुमारे चारशे चित्रपटात आपल्या अभिनयाचे सादरिकरण केले होते. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी आपली एक वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनामध्ये तयार केली होती.जगदीप यांनी १९५१ मध्ये बी.आर. चोप्रा यांच्या अफसाना चित्रपटातून बाल कलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. शम्मी कपूरच्या ब्रह्मचारी या चित्रपटापासून जगदीप यांचा विनोदवीराचा प्रवास सुरू झाला होता.
निशिकांत कामत

बॉलिवूड दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे १७ ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे निधन झाले. कामत हे लिव्हर सिरोसिस आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या जाण्याने बॉलीवूडमध्ये स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलेला हरहुन्नरी दिग्दर्शक हरपल्याची भावना रसिकांच्या मनात आहे. मुंबईतील रुईया महाविद्यालयापासून आपल्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या निशिकांत यांनी कायमच वेगळेपण जपलं.
निशिकांत कामत यांनी 'डोंबिवली फास्ट' या मराठी सिनेमाद्वारे सिनेदिग्दर्शनात पदार्पण केलं. ११/ ७ च्या मुंबई ट्रेन ब्लास्टवर आधारित 'मुंबई मेरी जान' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून त्यांनी पदार्पण केलं. त्यानंतर 'दृश्यम', 'मदारी', 'फोर्स', 'रॉकी हँडसम' यासारख्या सिनेमाचं दिग्दर्शन करत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. कामत यांनी मराठीमध्ये रितेश देशमुखने अभिनय केलेल्या 'लय भारी' या सिनेमाचं दिग्दर्शनही केलं आहे. दिग्दर्शनासोबत गेल्या काही वर्षात त्यांनी अभिनयातही हात अजमावला. मराठीत 'सातच्या आत घरात' या सिनेमात त्यांनी अभिनय केला. या सिनेमाचं लेखनही त्यांनी स्वतःच केलं होतं. तर, हिंदीत 'रॉकी हँडसम', 'डॅडी' या सिनेमातही त्यांनी अभिनय केला होता.गेल्या काही वर्षांपासून त्यांना लिव्हर सिरोसिसचा त्रास होता.
आसिफ बसरा

या वर्षी सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केलेल्या बॉलिवूडला आणखी एक धक्का दिला बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांनी. बसरा यांनीही धर्माशाळामध्ये १३ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. बसरा यांनी ३० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये केले होते. आसिफ बसरा यांनी 'वो' (१९९८), ब्लॅक फ्राईडे (२००४), जब वी मेट (२००७), वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई (२०१०), कृष ३ (२०१३), हिचकी (२०१८) आणि या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'पाताल लोक' या वेब सिरीजमध्ये अभिनय केला आहे.
निम्मी

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री निम्मी यांचे २६ मार्चला वयाच्या ८८ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. बऱ्याच काळापासून त्या आजारी होत्या. मुंबईच्या सरला नर्सिंग होममध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेत्री निम्मी यांनी १६ वर्षे चित्रपटसृष्टीत काम केले. १९४९ ते १९६५ या काळात त्या सिनेजगतात कार्यरत होत्या. त्यांना आपल्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्री समजले जात असे. त्यांचे खरे नाव नवाब बानो होते. निम्मी यांनी एस. रजा यांच्यासोबत विवाह केला होता. त्यांचे २००७ मध्ये निधन झाले होते.१९६५ मध्ये त्यांची कारकिर्द बहरत चालली होती तेव्हा त्यांनी एस. रजा यांच्यासोबत विवाह केला. एस. रजा यांनी अंदाज़ ,मदर इंडिया , सरस्वतीचंद्र आणि रेशमा और शेरा यासारख्या चित्रपटांचे लिखान केले होते. विनोदी अभिनेता मुखरी यांनी दोघांच्या विवाह जुळवण्यात महत्त्वाची भूमिका केली होती.
नवाब बानो हे नाव बदलून निम्मी हे नाव राज कपूर यांनीच त्यांना बहाल केले होते.राज कपूर यांनी त्यांना बरसात या चित्रपटातून ब्रेक दिला होता. त्यांनी आन, उड़न खटोला, भाई भाई, कुंदन, मेरे महबूब यासारख्या चित्रपटातून काम करीत लोकप्रियता मिळवली होती. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात निम्मी यांची खूप मागणी होती.असं म्हटलं जातं की, दिलीप कुमार यांच्यापासून राज कपूर, अशोक कुमार, धर्मेंद्र यासारखे मोठे कलाकार निम्मीसोबत काम करण्यासाठी उत्सुक होते. निम्मी यांनी १९५० ते ६० या दशकात अनेक दिग्गजांसोबत काम केले. दीदार आणि दाग चित्रपटातून निम्मी आणि दिलीप कुमार यांची जोडी हिट झाली.
आशालता

ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण झाल्याने २२ सप्टेंबर रोजी त्यांचे ७९ व्या वर्षी निधन झाले. आशालता वाबगावकर यांच्या अभिनय कारकीर्दीतील त्यांचे 'मत्स्यगंधा' हे नाटक मैलाचा दगड ठरले. इतक्या वर्षांनंतरही त्यांनी साकारलेली ‘मत्स्यगंधा’ आजही रसिकांच्या स्मरणात आहे. नाटकातील त्यांनी गायलेली ‘गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी’, ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ ही नाट्यपदे गाजली. ही नाट्यपदे आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.