नवी दिल्ली - स्मार्टफोनचा हल्ली अनेकजण जास्त वापर करतात. याच सवयीने भारतीय लोक हे स्मार्टफोनवर जगात सर्वाधिक वेळ घालविणारे ठरले आहेत. एवढेच नव्हे तर हे प्रमाण २०२५ पर्यंत ४ पटीने वाढेल, असा अंदाज नोकियाच्या अहवालात व्यक्त केला आहे.
नोकियाने मोबाईल ब्रॉडबँड इंडिया ट्रॅफिक इंडेक्स (एमबिट) २०२१ अहवाल प्रसिद्ध केला आहे. ब्रॉडबँडचा वापर मोबाईल फोनसाठी करण्यात भारताचा जगात दुसरा क्रमांक असल्याचे अहवालात म्हटले आहे. फिनलँडमध्ये ब्रॉडबँडचा वापर सर्वाधिक मोबाईलसाठी होतो. गेल्या पाच वर्षात डाटाचा वापर हा ६० पटीने वाढला आहे. डाटा वापरण्याचे प्रमाण सर्वाधिक भारतात वेगाने वाढले आहे.
हेही वाचा-दळणवळणाची समस्या; साखरेच्या निर्यातीत २४ टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज
नोकियाचे प्रमुख विपणन अधिकारी अमित मारवाह म्हणाले की, गेल्याचा पाच वर्षात डाटाचा वापर ६३ पटीने वाढला आहे. हे लक्षणीय आणि विक्रमी आहे. गेल्या पाच वर्षात कोणत्याही देशात डाटाचा एवढा वेगाने वापर झालेला नाही. ग्राहकांकडून डाटाच्या वापराच्या सकल वार्षिक वृद्धीदरात (सीएजीआर) ७६ टक्के वाढ झाली आहे. भारतीय ग्राहक हे महिन्याला सरासरी १३.७ जीबीचा वापर करत असल्याचे नोकियाच्या अहवालात म्हटले आहे. भारतीय ग्राहक सरासरी ४.४८ तास स्मार्टफोनवर इंटरनेट डाटाचा वापर करतात.
हेही वाचा-देशात पहिल्यांदाच सीएनजीवर चालणार ट्रॅक्टर; नितीन गडकरी करणार लाँचिंग