जालना - काँग्रेस हा खऱ्या अर्थाने दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिली असे सांगितले. मात्र, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले नाही. याउलट ज्या तीन राज्यात काँग्रेसची सत्ता आली, त्या तीनही राज्यात काँग्रेसने दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे शब्द पाळणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आणि आता या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षालाच निवडून द्या, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी भोकरदन येथे केले.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे जालना मतदारसंघाचे उमेदवार विलास अवताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्या विषयी अपशब्द वापरले. तरीदेखील भाजप सरकार गप्प आहे. यापुढे जाऊन हा खटला जे सरकारी वकील लढवत आहेत, त्यांना या संदर्भात असलेली माहिती आणि पुरावे ढिले सोडण्यास सांगितले जात आहे, जेणेकरून हा खटला कमकुवत होईल, अशी माहिती स्वतः या केस लढणाऱ्या सरकारी वकिलांनी दिली असल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी भाजपवर केला.
या सरकारने न्यायव्यवस्थेबद्दल देखील आस्था ठेवली नाही, निवृत्त न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचे सांगावे लागले. ही एक शोकांतिकाच आहे. त्यासोबत लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्रांवर लिखानाची बंदी घालून संविधानच धोक्यात आणले आहे. त्यामुळे आता या सरकारला खाली बसवल्याशिवाय पर्याय राहिला नसून काँग्रेसच्या विलास अवताडे यांनाच निवडून द्यावे, असे आवाहन अशोकराव चव्हाण यांनी केले.
माजी आमदार चंद्रकांत दानवे
अवताडे यांच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले, "खासदारांनी एक नवीन योजना आखली आहे, आणि त्या योजनेनुसार 'पन्ना प्रमुख' केले आहेत. पन्ना म्हणजे एका पानावर असलेल्या २५ मतदारांची यादी आणि ही एवढी माणसे एका कार्यकर्त्याने सांभाळायची आहेत. अशा पद्धतीने लोकांना वेठीस धरण्याचे काम खासदार दानवे यांनी सुरू केले आहे. त्यामुळे सामान्य माणूस प्रचंड त्रासला असून तो यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याने काँग्रेसच्या विलास आवताडे यांचा विजय निश्चित आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे भोकरदन शहरातीलच रहिवासी आहेत त्यांच्या पत्नी भोकरदन नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत. त्यांनीदेखील दानवे यांचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले की, दानवे यांचा अलिशान बंगला हा एका सोसायटीच्या जागेवर उभा आहे. त्या सोसायटीची जागा खासदार दानवे यांनी बळकावली आणि तीन एकरावर आपले वैभव उभे केले आहे.
विलास अवताडे उमेदवार
विलास अवताडे यांनीदेखील भाजप आणि खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करून काँग्रेस पक्षाला निवडून देऊन लोकशाही टिकवावी, असे आवाहन केले. या सभेला आमदार राजेश टोपे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश जेथलिया, जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आदींची उपस्थिती होती