ठाणे - मुंबई-नाशिक हायवेवरती असलेला कळवा खाडी पूल (Kalwa Khadi Deadbody) आता मृतदेह फेकण्याच ठिकाण झाले आहे. हत्या करून याठिकाणी मृतदेह फेकण्याचे असे प्रकार या भागात वारंवार होत असल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death) यांच्या हत्येनंतर आजपर्यंत या खाडीत एकूण 15 मृतहेद सापडले आहे.
राष्ट्रीय महामार्गाचा फायदा घेऊन टाकले जातात मृतहेद -
करोडो रुपयांचा खर्च करून कळवा रेतीबंदर परिसरामध्ये खाडीचे सुशोभीकरण करून येथे रेतीबंदर घाट बनवण्यात आला. या परिसरामध्ये असलेली निसर्गरम्य परिस्थिती लक्षात ठेवून महानगरपालिकेने या ठिकाणी नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, आता हीच सुविधा या परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना धोकादायक वाटत आहे. या परिसरात मागील वर्षभरात 15 मृतदेह सापडले आहेत. ज्यामध्ये दोन हत्या या उघडकीस आल्या आहेत. या ठिकाणी असलेला सुरक्षेचा अभाव आणि शेजारीच असलेला राष्ट्रीय महामार्ग याचाच फायदा घेत गैरकृत्य करणारी लोक या भागात मृतदेह फेकत आहेत. पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्याकडून कुठेतरी हलगर्जीपणा होत असल्यामुळेच हे प्रकार येथे वारंवार होत आहेत. दिवसभरात याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या हजारोंची आहे, असे असले तरी रात्री या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसते आणि याचाच फायदा घेत मृतदेह फेकण्याचे प्रकार आता वाढू लागले आहेत. हत्या करून हायवे मार्गे या परिसरात सहजरीत्या येता येऊ शकते रस्त्यावरती पोलीस नसल्याचा आणि या परिसरात सुरक्षा रक्षक नसल्याचा फायदा घेत मृतदेह खाडीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मनसुख हिरेनचाही सापडला होता मृतदेह -
मनसुख हिरेन यांची हत्या करून त्यांचा मृतदेह याच ठिकाणी टाकण्यात आला होता. रात्रीच्या वेळेस रुमाल बांधून या ठिकाणी दाखल होत, मनसुख यांचा मृतदेह सचिन वाजे यांनी या भागात टाकला होता. याचा तपास करताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली होती.
दोन दिवसांपूर्वी झाली होती हत्या -
१ डिसेंबर रोजी कळवा खाडीत ३० ते ४० वर्षीय पुरुष व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह अनोळखी व्यक्तीचा असून पुरावा नष्ट करण्याच्या उददेशाने खाडीच्या वाहत्या पाण्यात टाकल्याचे स्पष्ट झाले होते.
नागरिकांनी केली सुरक्षेची मागणी-
ठाण्यातील या सुंदर खाडी किनाऱ्यावर जर पोलिसांनी आणि महानगर पालिकेने सुरक्षा व्यवस्था ठेवली, तर या ठिकाणी कोणतेही अनुचित प्रकार होणार नाही. येथे भविष्यात जलवाहतूक सुरू होणार आहे, अशा वेळी जर अशीच परिस्थिती कायम राहिली, तर याचा परिणाम प्रवासी संख्यावर होईल, असे नागरिक सांगत आहे.