ठाणे - तब्बल सव्वापाच वर्ष सेवा बजावल्यानंतर ठाणे महापालिकेचे डॅशिंग आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अखेर ठाण्याला अलविदा केला. बुधवारी ठाणे महापालिकेत प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक गप्पा मारताना, आज मी 'माजी आयुक्त' किंबहुना, संजीव जयस्वाल म्हणून सर्वांना सामोरे जात असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, गत पाच वर्षात उठता-बसता तसेच झोपेतही केवळ ठाणे शहराचा विचार आणि विकास चिंतत होतो. तसेच अडीअडचणीला एकमेकांसोबत होतो. काही बाबींवरून भांडणेही झालीत, अशी कबुली देत पालिकेतील वादंगांवर पडदा टाकला. निवृत्तीनंतर ठाण्यातील कामगिरीवर बायोग्राफी स्वरूपात पुस्तक लिहिणार, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिकेत आयुक्तपदी १२ जानेवारी २०१५ ला रुजू झालेल्या संजीव जयस्वाल यांनी ठाण्यात रेकॉर्डब्रेक कार्यकाळ बजावला. तब्बल सव्वापाच वर्षे आयुक्तपदी राहिलेल्या जयस्वाल यांनी पालिकेच्या महसूल वाढीसह रस्ता रुंदीकरण व विविध महत्वकांक्षी प्रकल्प राबवले आहेत. प्रसारमाध्यमांसह तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान मंत्री व लोकप्रतिनिधींचेही उत्तम सहकार्य लाभले आहे. आपल्या कामाचे रिपोर्ट कार्ड देण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अनधिकृत बांधकामे तसेच बार-लॉजसारख्या प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी हातोडा चालवल्याने प्रसंगी संपूर्ण कुटुंबाला बदनामीकारक मोहिमेलाही तोंड द्यावे लागले. मात्र, ठाणेकरांचे प्रेम हीच खरी शक्ती होती. जेणेकरून शहराच्या विकासासाठी झटण्याची प्रेरणा मिळाली. या सर्व कटू-गोड आठवणीबाबत भविष्यात बायोग्राफी स्वरूपात पुस्तक लिहिणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगत जड अंतकरणाने ठाण्याचा निरोप घेतला.
हेही वाचा -