ठाणे - रेल्वेतून वन्य पशुपक्ष्यांची तस्करी प्रकरणी ठाणे वन विभागाने कारवाई केली आहे. या प्रकरणी एका टोळीच्या म्होरक्यासहीत तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून वेगवेगळया प्रजातीचे 47 वन्य पक्षी व 7 वन्यप्राणी हस्तगत करण्यात आले आहेत. शेख अब्दुल नबी उर्फ परवेझ खान (रा. मिस्त्रीगंज, हैदराबाद) असे या म्होरक्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
हेही वाचा... प्रलंबित सीमा प्रश्न सोडवण्यासाठी चीनचे परराष्ट्रमंत्री व अजित डोवाल यांच्यात आज चर्चा
वनविभागाने 10 डिसेंबरला ठाण्यात कर्नाटक येथील आर. के. मोहम्मद खलील रियाज अहमद (24) राहणार बंगळूर याला कोईम्बतूर-कुर्ला एक्सप्रेसने येताना वेगवेगळया प्रजातीचे पक्षी आणि प्राण्यांसह अटक केली होती. त्याने हे वन्य पक्षी हैदराबाद येथून खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. यापैकी काही पक्षी तो मुंबईतील भायखळा येथे विक्री करणार होता. त्यानुसार ग्राहक शाहरुख खान व किशन रामपाल यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पक्षी जप्त केले होते.
हेही वाचा... एकनाथ खडसेंचं ठरलं... म्हणाले लवकरच पक्षांतर!
या ग्राहकांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून तपास अधिकारी वनक्षेत्रपाल नरेंन्द्र मुठे यांच्या पथकाने हैदराबाद येथे जाऊन या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेख यास ताब्यात घेतले. त्याच्या पक्षी विक्री करण्याच्या दुकानातून 7 ठिपकेदार मुनिया पक्षी व 16 सुगरण पक्षी जप्त केले. हे सर्व पक्षी वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संरक्षीत वन्यपक्षी आहेत. वनविभागाने हस्तगत केलेल्या सर्व वन्यप्राण्यांना आणि पक्षांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे.