ठाणे - विधानसभेत सत्तेसाठी झालेली राजकीय बंड महाराष्ट्राला नवीन नाहीत. तीन-चार वेळा सार्वजनिकरित्या तर अनेकदा विविध पक्षांमधली वैयक्तिक बंड महाराष्ट्रानं आजवर पाहिलीत. मात्र, शिवसेनेसारखी अति शिस्तीचा गवगवा करणारा पक्ष आडवा करून उलट स्वतःच शिवसेना असल्याचा दावा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ( Chief Minister Eknath Shinde ) यशस्वी करून दाखवलेलं आजचं बंड खर्या अर्थानं महाराष्ट्र, देशाचं हे अर्धशतकातलं मोठ्ठं बंड आहे. या सत्ता बंडाच्या इतिहासातले शरद पवार हेच खरे हिरो आहेत. पुलोदसाठी पवारांनी साक्षात वसंतरावांना लोळवलं आणि एस काँग्रेस सत्तेत आली. त्यानंतर खर्या अर्थानं मोठ्ठं बंड हे भुजबळांचं होतं.
90 च्या दशकात भुजबळांचं बंड - भुजबळांनी 90 च्या दशकात हिच शिवसेना आडवी करून काँग्रेससोबत घरोबा केला होता. शिवसेनेचं कंबरडं मोडण्याचं खरं काम तेव्हाच झालं होतं. शिवसेनेच्या दहशतीचा कथित बुरखा देखील तेव्हाच फाडला गेला होता. ठाण्यातल्याच फुटीर खोपकर हत्येनंतर शिवसेनेत बंड होत नव्हतं. खोपकर होण्याची भीती दाखविली जायची तिही या बंडानं संपविली. त्यानंतर आणखीन 3 मोठ्या माणसांची बंड तिही शिवसेनेतली महाराष्ट्रानं पाहिली. त्यात गणेश नाईक, नारायण राणे ( Narayan Rane ) यांच्या बंडापेक्षा राज ठाकरेंचं बंड ( Raj Thackeray revolt ) मोठ्ठं म्हणावं लागेल. कारण राज यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात थेट फुट पडली. फार मोठी हानी झाली नाही. मात्र, पक्ष फुटला होता. त्यापूर्वी गणेश नाईकांचं एकट्याचं बंड ही अधोरेखित करावं लागेल. शिवसेनेशी थेट 2 हात करत नाईक बाहेर पडले. नारायण राणेंचंही तसंच झालं. मात्र राण्यांसोबत 2 आमदार सोडले तर शिवसेना फुटली नाही. त्यांचा प्रभाव त्यांच्या जिल्ह्यापुरता जाणवला. त्यांच्यासोबत मुंबईसह कोंकणच्या सेनेला भगदाड पडेल हा अंदाजही फोल ठरला.
हेही वाचा - Yashomati Thakur : अमरावतीमध्ये घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो - यशोमती ठाकूर
शिवसेनेतिल सर्वात मोठे बंड - एकनाथ शिंदेंचं आव्हानही वरील सर्वच बंडाप्रमाणे नेतृत्वाविरोधातलीच आग आहे. ती बराच काळ धुमसत न रहाता थेट पेटली. एक-दोन नव्हे तर सेनेतील 54 आमदारांपैकी तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. त्याला कारण त्यांच्यावर असलेला विश्वास हा विश्वास राणेंवर असता तर तेव्हाच विधानसभेबरोबरच शिवसेना फुटली असती. म्हणूनच महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचं अर्धशतकातलं हे यशस्वी झालेले सर्वात मोठ्ठं बंड म्हणून ओळखलं जातं.
हेही वाचा - Bhaskarrao Jadhav : ज्यांच्या मागे ED लावली त्यांनाच केंद्राने सुरक्षा दिली; भास्कर जाधवांचा आरोप