सोलापूर (पंढरपूर) - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चैत्रीवारी शुध्द कामदा एकादशी निमित्त नित्यपूजा संपन्न झाली. मंदिरातील पुजारांच्या हस्ते करण्यात आली. दरवर्षी या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मंदिर पदाधिकाऱ्यांच्याच उपस्थितीत पूजा करण्यात आली. यावेळी मंदीर समितीचे सह अध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या ॲड. माधवी निगडे, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी उपस्थितीत होते.
विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांना बंदी
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर 5 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले. आता 23 एप्रिल रोजी होणारी चैत्रीयात्रा प्रतीकात्मक स्वरुपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या कालावधीत विठ्ठलाचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू आहेत. त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेनुसार येणाऱ्या सर्व दिंड्या व सर्व पायी येणाऱ्या वारकरी भाविकांनी या काळात बंदी घालण्यात आली आहे. चैत्र वारी निमित्ताने पंढरपुरात भाविकांची गर्दी करू नये, असे आवाहन विठ्ठल मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.
पंढरपुरात पोलिसांचा मोठा फौजफाटा
राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 5 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत धार्मिक स्थळ बंद केली आहे. मात्र, एकादशी दिवशी पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊ नये, म्हणून पोलीस प्रशासनाकडून अकराशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून 500 पोलीस कर्मचारी, 500 होमगार्ड, एसआरपी कंपनी, 3 उपविभागीय पोलीस अधिकारी, 5 पोलीस निरीक्षक, 50 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 15 महिला सहायक पोलीस निरीक्षकांचा तैनात असणार आहे. पंढरपूर येथे 20 ते 24 एप्रिलपर्यंत पोलीस तैनात असणार आहे.
गत वर्षीप्रमाणे यावर्षीही चैत्रवारी रद्द
विठ्ठल रुक्मिणी मातेची चैत्रवारी चार मोठ्या वाऱ्यांपैकी एक आहे. गतवर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची चैत्री यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आषाढी, कार्तिकी, माघवारी जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात आली होती. गेल्या वर्षभरामध्ये पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चार यात्रांपैकी कोणतीही यात्रा संपन्न झाली नाही. मात्र, राज्य सरकारकडून दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन भाविकांसाठी खुले केले होते. त्यामध्ये मंदिर समितीला कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत मुखदर्शनाची सोय करावी अशी सूचना दिली होती.