पुणे - सध्या सुरू असलेल्या नवरात्र उत्सव आणि येत्या शुक्रवारी असलेल्या दसऱ्याच्या निमित्ताने नारळाला भाव आला आहे. सध्या पुण्यात दिवसाला दीड ते दोन लाख नारळांची विक्री होत असून सध्या नारळांचा पुरवठा कमी झाल्याने दरामध्ये वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. पाऊस असल्याने माल कमी येत आहे, त्यामुळे नारळाला चांगला भाव आलेला आहे. साधारणतः दसऱ्यापर्यंत ही मागणी कायम असणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
नारळाच्या दरात वाढ
राज्यातील सर्वच मंदिरे आणि प्रार्थनास्थळे घटस्थापनेपासून पुन्हा खुली झाली आहेत. पहिल्या दिवसापासून सर्व प्रार्थना स्थळांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून पूजा तसेच तोरणासाठी नारळाची मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत नारळांचा पुरवठा कमी असून त्याचे दर काही प्रमाणात वाढले आहे.
शेकड्यामागे 150 ते 200 रुपयांची वाढ
नारळाचे उत्पादन प्रामुख्याने तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशात होते. त्यामुळे पुण्यासह महाराष्ट्रात या भागातून मोठ्या प्रमाणात दररोज आवक होत आहे. पुण्यात दररोज अडीच ते तीन लाख नारळांची अर्थात अडीच हजार पोत्यांची आवक होते. मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नारळाचा पुरवठा खंडित झाला आहे. त्याचपद्धतीने तोडणी लोडिंग करण्यासाठी कामगार मिळत नाहीत. उत्पादन असून नारळाचा पुरवठा होत नसल्याने दरवाढ झाली आहे. शेकड्यामागे 150 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे. तामिळनाडू येथील नारळाची 150 ते 200 तर कर्नाटकातील नारळाची 50 ते 100 रुपयांची वाढ झाली आहे.