गोवा (पणजी) - आगामी विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) सत्ता आल्यावर भंडारी समाजाचा मुख्यमंत्री तर ख्रिश्चन समाजाचा उपमुख्यमंत्री करण्यात येईल, अशी घोषणा गुरुवारी मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आप जातीचे राजकारण करत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारी समाजाची मते पदरात पाडून घेण्यासाठी आम आदमी पक्षाने आगामी मुख्यमंत्री याच पक्षाचा होईल अशी घोषणा करून राज्यात जातीय राजकारणाला सुरुवात केली आहे असा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. गुरुवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भंडारी समाजाच्या विजयी उमेदवाराला मुख्यमंत्री तर ख्रिश्चन समाजाला उपमुख्यमंत्री पद दिले जाईल अशी घोषणा केली होती. त्यावर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या व दिल्लीच्या आमदार अलका लांबा (MLA Alka Lamba) यांनी जोरदार टीका केली.
![काँग्रेसकडून जातीयवादाचा आरोप](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-goa-2-panji-10058_12112021022110_1211f_1636663870_623.jpg)
भंडारी समाजावर 60 वर्षात अन्याय झाला - सिसोदिया
राज्यात भंडारी समाजाची लोकसंख्या ३० टक्के आहे. मागच्या ६० वर्षात भंडारी समाजाचे नेते व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या वाट्याला केवळ अडीच वर्ष मुख्यमंत्री पद उपभोगता आले. त्यामुळे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने या समाजावर अन्याय केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाची सत्ता आल्यावर भंडारी समाजाला मुख्यमंत्री तर ख्रिश्चन समाजाला उपमुख्यमंत्री पद तसेच सर्वच जाती धर्माच्या लोकांनां कॅबिनेट मंत्रीपदे दिली जाणार असल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आप जातीचे राजकारण करते
भ्रष्टाचार, लोकपाल, विकास या मुद्द्यावर दिल्लीत निवडून आलेल्या आम आदमी पक्षाकडे निवडणूक लढविण्यासाठी गोव्यात कोणतेही ठळक मुद्दे नाही आहेत. त्यामुळे हा पक्ष राज्यात जातीचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या अलका लांबा यांनी ईटीव्ही शी बोलताना केला.