नाशिक - पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरातील 1 हजार 77 धोकादायक वाड्यांसह मिळकतीतील रहिवासी नोटीसा देऊन सुद्धा जागा खाली करण्यास तयार नसल्याने मनपा आयुक्त रमेश पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. धोकादायक वाड्यातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा, जर कोणी ऐकण्यास तयार नसेल तर तेथील वीज व पाणीपुरवठा खंडीत करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
हेही वाचा - Importance of Vatpoornima Vrata : महंत अनिकेत देशपांडे यांनी सांगितले वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व
जुने नाशिक भागात आजही सर्वाधिक वाडे आहेत. मात्र, यातील बहुतांशी वाडे धोकादायक झाले असून अनेकदा पावसाळ्यात वाडे कोसळण्याच्या घटना घडत असतात. असे असताना नागरिक धोकादायक वाड्यांमध्ये जीव मुठीत धरून राहतात. दरवर्षी पावसाळा आला की शहरातील धोकादायक बनलेल्या जुन्या इमारती, वाडे, घरांना पालिकेच्या माध्यमातून नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडले जाते. 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सप्टेंबर महिन्यात धोकादायक मिळकतींना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. अशात शहरातील भद्रकाली भागातील जुना वाडा कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाल्यानंतर पालिकेने धोकादायक ठरणाऱ्या मिळकतींना पुन्हा नोटीस बजावण्याची कारवाई केली आहे.
2021 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना सुद्धा पावसाळा सुरू होण्याआधी पालिकेचा अग्निशमन विभाग, नगररचना विभाग यांनी आकडेवारी मिळत नाही म्हणून कारवाई करण्याची भूमिका घेतली नसल्याने मनपाच्या बेफिकिरीबाबत टीका होते होती. अशात आता मनपा आयुक्त रमेश पवार यांनी मे महिन्यात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. सर्वेक्षण करून वाडे धोकादायक असतील त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानंतर संबंधित वाडा मिळकत धारकांना प्रथम नोटीस देऊन व सुरक्षित स्थळी हलवण्यातबाबत सूचित केले गेले. त्यानंतरही अनेक मिळकतीतील रहिवासी राहत असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा नोटीस देऊन संबंधितांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आदेशित करूनही ते जात नसतील तर त्यांचा वीज, तसेच पाणीपुरवठा खंडित करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
राजकीय नेत्यांचे हितसंबंध - जुने नाशिक परिसरातील शेकडो वाड्यांमध्ये जुने भाडेकरू राहत आहेत. आजही भाडेकरूंना दरमहा दहा ते शंभर रुपये नाममात्र भाडे आहे. या रकमेतून वाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही भागत नसल्याने घर मालक वैतागले आहेत. अनेक घर मालक आणि भाडेकरूंचे वाद न्यायालयात सुरू आहेत. अशात अनेक राजकीय नेते याचा फायदा घेतात. स्थानिक नगरसेवकांनी वाडे विकत घेतले आहेत. त्यातून राजकीय हितसंबंध तयार झाले आहेत. त्यामुळे, पालिकाही गप्प आहे. मात्र, असे असले तरी वाड्यांमध्ये राहणाऱ्यांचा जीव मात्र डावाला लागला आहे.
कुठल्या विभागात किती वाडे,घर -
नाशिक पश्चिम - 600
पंचवटी - 198
नाशिक पूर्व - 117
नाशिक रोड - 69
सातपूर - 68
नवीन नाशिक - 25
एकूण - 1077
हेही वाचा - नाशकात किशोरवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, मानसोपचार तज्ज्ञाचे मत