नागपूर - उपराजधानी नागपूरला संत्रा नगरी अशी ओळख मिळाली आहे. त्याचे कारण म्हणजे, विदर्भात अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेले संत्र्याचे उत्पादन. पण यंदा तापमानामुळे संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मग मागील काही वर्षांत व्हॅल्यू एडिशन न झाल्यामुळे संत्रा उत्पादकांना फारसा फायदा झालेला नाही. दरवर्षी लाखो क्विंटल संत्रा ( Chef Vishnu Manohar on orange export ) उत्पादन होतो, मात्र संत्र्यापासून तयार होणारे पदार्थ हे नागपुरातच किंबहुना महाराष्ट्रातच राहून गेले. उत्तम अशी चव असलेले संत्र्याचे पदार्थ महाराष्ट्रपुरते मर्यादित राहिले, हे वास्तव असल्याचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ( Chef Vishnu Manohar news Nagpur ) 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा - विदर्भावर सूर्यनारायणाची वक्रदृष्टी; वर्धेचं तापमान 46.5 डिग्री वर
संत्र्यामध्ये बी असल्याने त्यास टेबल फ्रुट अशी ओळख मिळाली, कारण बी असल्याने यावर प्रक्रिया करणे अडचणीचे आहे. यातच या वाणावर संशोधन न झाल्याने त्यावर व्हॅल्यू एडिशन होऊ शकले नाही. संत्रा हा नाशवंत आहे. तो फार जास्त काळ साठवून ठेवला जाऊ शकत नाही. हे त्याच्या अपयशाचे कारण ठरते. संत्रा साठवून ठेवता आला असता तर त्याचा आधीक फायदा झाला असता. शेतकऱ्यांनाही दोन पैसे अधिकचे मिळाले असते.
संत्रा नागपूरची ओळख झाली तरी कशी - मुळात रघुजी राजे भोसले हे ईशान्य भारतात गेले असताना त्यांना एक व्यक्तीने संत्र्याचे रोप दिले. याच रोपापासून सुमारे 200 वर्षांपूर्वी संत्रा लागवड झाली. हळूहळू संत्र्याची चव उत्तम असल्याने संत्र्याच्या बागा तयार झाल्या. विदर्भातील भौगोलिक परिस्थिती पाहता संत्र्याची चव ही आंबट आणि गोड असल्याने वेगळी चव ही अनेकांना भुरळ घालते. पण ही चव भुरळ घालत असली तरी जास्त दिवस टिकण्याची क्षमता नसल्याने पाहिजे त्याप्रमाणात संत्र्याची निर्यात होऊ शकली नाही.
संत्र्याचे होऊ शकतात अनेक पदार्थ - यातच महाराष्ट्रात संत्रा बर्फी प्रसिद्ध आहे. पण, ही बर्फी संत्र्याच्या उत्पादन काळात मिळत असल्यास उत्तम. पण इतरवेळी मिळणारी बर्फी खरच संत्रा बर्फी आहे का? हा प्रश्न नागरिक उपस्थित करतात. यात जर संत्र्याची साठवणूक करता आली असती तर याचा फायदा पदार्थ बनवण्यासाठी झाला असता, असे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर सांगतात. संत्र्यापासून बर्फी तयार होऊ शकते. मारमालेट तयार होऊ शकते. संत्रा कँडी होऊ शकते, संत्रा ज्यूस, संत्र्याचे लाडू पण तयार होऊ शकतात, असेही प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
ईटीव्ही भारतकडून वाढत्या तापमानामुळे संत्रा उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीची व्यथा मांडत लक्ष वेधण्यात आले. तापमानामुळे संत्रा गळती होऊन जवळपास 500 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शिवाजी कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापक वर्गाकडून व्यक्त झाला आहे. यंदाही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आहे. तेच मागील दोन वर्षांत संत्र्याला पाहिजे तो दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.