मुंबई - मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्पातील पोलिसांच्या घरांचा किमतीवरून विरोध झाल्यानंतर अखेर ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पोलिसांना आता 25 लाख रुपयात घरे देण्यात येणार ( House To Police In Mumbai) असून याबाबतची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे दिली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार बीडीडी चाळीतील निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना आता 50 ऐवजी 25 लाख रुपयात कायमस्वरूपी घर देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पोलिसांनी आपली घरे लवकरात लवकर रिकामी करावी आणि प्रकल्प पुढे जाऊ द्या असे आवाहनही त्यांनी या ट्विट द्वारे केले आहे.
2250 पोलिसांचा प्रश्न मार्गी - बीडीडी चाळींचा नायगाव वरळी आणि ना. म. जोशी मार्ग याठिकाणी सुमारे बावीसशे पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरे दिली जातात. यातील निवृत्त कर्मचार्यांची घरे त्यांना मिळावीत यासाठी गेली चार वर्ष संघर्ष सुरू होता. अखेरीस या 2011 पर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची घरे मिळतील. मात्र, त्यासाठी 50 लाख रुपये किंमत मोजावी लागेल, असा निर्णय सरकारने घेतला या निर्णयाला ही विरोध झाल्यानंतर अखेर आता सरकारने ही घरे पंचवीस लाख रुपयात देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बावीसशे पन्नास पोलिस कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आता तरी पोलीस कर्मचारी आपली घरे रिकामी करतील आणि प्रकल्प मार्गी लागेल, अशी आशा ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प समितीचे सरचिटणीस तानाजी केसरकर यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - Maharashtra Poltical Crisis: 38 आमदारांनी पाठिंबा काढला सरकार अल्पमतात - शिंदे गटाचा याचिकेत दावा