मुंबई - विद्यापीठात तत्काळ कॉल सेंटर सुरू करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री रविंद्र वायकर यांनी दिले आहेत. वायकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांना या आशयाचे पत्र पाठवले आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना भेडसावणार्या समस्यांचे तात्काळ निराकरण व्हावे यासाठी ही सेवा सुरू होणार आहे.
मुंबई विद्यापीठाचा विस्तार सावंतवाडी, रत्नागिरी, रायगड, पनवेल, मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, डहाणूपर्यंत आहे. ७८० महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. या सर्व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ५ लाखांपेक्षा जास्त आहे.
परीक्षेचा अर्ज भरताना, निकाल आणि इतर छोट्या-छोट्या कामांसाठी विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठात किंवा उपकेंद्रात सातत्याने जावे लागते. काही वेळा अनेक फेऱ्यानंतरही विद्यार्थ्यांचे काम होत नाही. ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेता. बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळता येऊ शकते. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अद्ययावत कॉल सेंटर सुरू करावे, असा अतारांकीत प्रश्न विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला होता.
हेही वाचा - क्युएस जागतिक विद्यापीठाच्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठाची भरारी
या प्रश्नाला उत्तर देताना विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाचे मोबाईल अॅप कार्यरत आहे. अद्ययावत कॉल सेंटर सुरू करण्याबाबत विद्यापीठ स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे, छापील उत्तर देण्यात आले. बदलत्या काळानुसार कॉल सेंटर ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची व पैशाची बचत होणार असल्याचे, रविंद्र वायकर यांनी पत्रात नमुद केले आहे.