मुंबई - महामारी जाहीर झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १४ तास राबणाऱ्या पोलिसांना ७ तारीख उलटली तरी वेतन देण्यात आलेले नाही. हा प्रकार गंभीर असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी तातडीने वेतन द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. याबाबतचे ट्विट प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केले आहे.
वंचितचे म्हणणे पुढीलप्रमाणे : १४ तास सेवा व सुरक्षा देणा-या आरोग्य, पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना विशेष आर्थिक व हेल्थ पॅकेज देणे गरजेचे होते. परंतु, सरकारने त्यावर कुठलाही निर्णय घेतला नाही. त्याऐवजी पगार कपातीचा व दोन टप्प्यात पगार देणयाचा निर्णय घेतला. त्यावर वंचितने आक्षेप घेउन अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी वगळण्यात यावे, अशी मागणी रेटून धरल्यावर सरकारकडून अत्यावश्यक सेवेतील आरोग्य पोलीस यांना वगळण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, सदर निर्णय हा पोलीस विभागात पोहचला नाही असे दिसते. त्यामुळे पगारात कपात आणि ती ५० की २५ टक्के म्हणजे किती करावी या वर चर्चा सुरू आहे की, काय अशी शंका निर्माण झाली आहे.
राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी व पत्रकार यांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे व पोलीसांसह सर्व अधिकारी कर्मचारी यांना दोन दिवसात वेतन अदा करण्यात यावे अशीही मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.